Wednesday, January 26, 2022

भिगवण पक्षी अभयारण्य आणि धर्मवीर गड स्थळदर्शन

तारीख.-23 जानेवारी 2022
भिगवण पक्षीअरण्य   

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग दरम्यान  असणारं भिगवण गाव आज पक्षी अभ्यासकांसाठी एक पर्वणी म्हणून  उदयास येत आहे ते इतके की अगदी आता ह्या अभयारण्यास महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून देखील संबोधले जाऊ लागले आहे. भिगवणजवळ असणा-या उजनी धरणाच्या परिसरात शेकडो प्रकारचे परदेशी व स्थानिक पक्षी पाहायला मिळतात. जानेवारी ते एप्रिल या काळात राज्यातला प्रत्येक पक्षीप्रेमी आणि फोटोग्राफर ही पंढरीची वारी करतोच करतो.त्यातलाच मी देखील गेले तीन ते चार वर्षांपासून नित्य नियमाने भेट देणारा त्यातूनही भिगवणच मोठ आकर्षण म्हणजे गुलाबी पायांचे नितांत सुंदर असे  फ्लेमिंगो पक्षी. त्यामुळेच ह्या वर्षी ठरवल की श्रीरामपूरकराना देखील  भिगवणला पक्षी बघण्यास घेऊन जायच .भिगवण आणि इथल्या परिसरात दरवर्षी हे परदेशी पक्षी लाखो-हजारो मैलांचे अंतर पार करून येऊन पोहोचतात. जानेवारी ते मार्च हा या पक्ष्यांना भेटण्याचा उत्तम काळ.अशी ही सफर करायच्या उद्देशाने आम्ही सकाळी श्रीरामपूर मधून निघालो भिगवण ला जाताना मराठ्यांच्या वाईट इतिहासाचा साक्षीदार असलेला धर्मवीरगड करायचे हे नियोजन होतेच ह्या गडाच्या इतिहासा संदर्भात मी खाली सविस्तर मांडणी केलीच आहे ती जरूर वाचावी .असा हा प्रवास करत आम्ही धर्मवीर गड करून झाल्यावर एक तासातच कुंभारगावला पोहोचलो. हे भिगवणजवळच  एक लहानस खेडेगाव. इथेच उजनी धरणाच विस्तीर्ण पात्र आहे. म्हणजेच पक्षी निरिक्षकांचं पक्षीतीर्थ!  परदेशातून काही काळासाठी स्थलांतर करून थंडीच्या दिवसात आपल्या इकडे राहाणारे स्थलांतरीत म्हणजे मायग्रेटरी बर्ड्स पाहण्याचे उत्तम ठिकाण म्हणून भिगवण ओळखलं जात. आता गेली काही वर्ष तर इथे हौशी पक्षीप्रेमींची मांदियाळीच जमते. अगदी पक्षीप्रेमी नसलेलेही इथपर्यंत धरणाच्या पाण्याकाठी वीकेंड साजरा करायला म्हणून येऊन पोहोचतात. दुपारी तीन वाजता आम्ही पोहचल्यावर भिगवण ला यायच आणि मच्छीचा आस्वाद घ्यायचा नाही अस होऊच शकत नाही आणि आम्ही सर्वांनी  अप्रतिम आशा मच्छी थाळीचा आस्वाद घेऊन साडेचार वाजता पक्षी पाहण्यासाठी बोट राईड चालू केली. इथल्या पक्ष्यांची काहीच माहिती नसेल तर तिथे मार्गदर्शक पुस्तकंही विकायला ठेवलेली आहेत. शिवाय गाईडही जलसफारीत सोबत असतोच.या बोटिंगच्याच माध्यमातून पक्षी पाहाण्याची संधी मिळते. धरणात भरपूर प्रकारचं जलचर खाद्य उपलब्ध असल्याने सर्व प्रमुख पक्ष्यांची इथे जत्राच भरलेली असते. इथे अगदी दोन दिवस काढलेत तरी परिसरातले ७० टक्के पक्षी पाहून होतात. ग्रेटर फ्लेमिंगो (रोहित), पेटेंड स्टॉर्क, लिटल कॉर्मोरँट, पर्पल स्वँप हेन, रडी शेल डक (चक्रवाक), नॉर्दन शॉवेलर, एशियन ओपनबिल, युरेशियन स्पूनबिल, ब्राऊन हेडेड गल, सीगल, इग्रेट, पाँड हेरॉन, ब्लॅक विंग्ड स्टिल्ट, सँडपायपर, ओरिएंटल व्हाईट एबिस, स्मॉल पॅटिनकोल आणि इतर असंख्य प्रकारचे या यादीत नसलेले पक्षी या उजनी धरणाच्या पाण्यात विहार करताना पाहाण म्हणजे पक्षीप्रेमींच्या आयुष्यातील सुर्वणक्षणच असा हा भिगवणजवळचा परिसर,  इथे एकदा तरी भेट द्यायलाच हवी.पक्षी पाहण्यासाठी पहाटे सहा वाजता आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळची नावेतली फेरी चुकवू नका.असा हा अविस्मरणीय अनुभव घेऊन आम्ही संध्याकाळी सात वाजता परतीचा प्रवास चालू केला असा हा आनंद ग्रुप मधील सर्वांनी  पहिल्यांदाच घेतला असल्यामुळे सर्वांचा चेहऱ्यावर जो आनंद होता तो बस मध्ये ओसंडून वाहत होता.
















धर्मवीरगड स्थळदर्शन


भिगवण ला जाताना आम्ही धर्मवीरगड ला भेट दिली  ह्या गडाविषयी सांगायच झाल्यास 
महाराजांनी अनेक किल्ले दुरुस्त केले. काही नव्याने बांधले. यांच्याच अंगाखांद्यावर इतिहास लिहिला गेला. म्हणूनच आपल्यासारख्या भटक्यांसाठी ही ठिकाणे म्हणजे संघर्षाची प्रतीकेच म्हटली पाहिजेत. मराठय़ांच्या युद्धाच्या विजयाचे क्षण जसे या गडांनी अनुभवले तसेच काही दु:खद प्रसंगाचा आवेगही यांनी पाहिला. असाच एक दुर्दैवी आणि कठोर प्रसंग एका किल्ल्याने पाहिला. बहादूरगड असे या किल्ल्याचे नाव आणि तो प्रसंग होता स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजेंचा औरंगजेबाने केलेला अनन्वीत छळ!औरंगजेबाने शंभूराजांना संगमेश्वर येथे पकडून याच गडावर आणले. याच ठिकाणी क्रुरकरम्याऔरंग्याने शंभूराजेंचे प्रचंड हाल केले. त्यांचे डोळे काढले, जीभ छाटली परंतु तरीही शंभूराजेंनी स्वाभिमान सोडला नाही. शिवाजी राजांनी निर्माण केलेले स्वराज्य अबाधित राखण्यासाठी दिलेले हे योगदान या बहादूरगडाने अत्यंत जड अंतकरणाने अनुभवले. स्वराज्य धर्माच्या रक्षणासाठी असे योगदान जगात कुठेही आढळणार नाही. राजांच्या याच स्मृती जागविण्यासाठी अनेक शंभूप्रेमी या गडाला ‘धर्मवीरगड’ असेही संबोधतात.बहादूरगड हा भुईकोट प्रकारातील किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील पेडगावात भीमा नदीच्या काठावर उभा आहे. गावाच्या नावावरूनच या गडाला ‘पेडगावचा किल्ला’ असेही म्हटले जाते. या किल्ल्याची तटबंदी भीमा नदीला समांतर अशी आहे. सध्या या भुईकोटाची अवस्था अत्यंत खराब असून आतील ब-याचशा इमारती पूर्णत: ढासळल्या असून सर्वत्र बाभळीचे रान माजले तटबंदीही ब-याच ठिकाणी पडलेली दिसते. या सर्व पडझडीत एक विशेष गोष्ट दिसते. ती म्हणजे या भकास किल्ल्यात उत्कृष्ट स्थापत्याची सुरेख मंदिरे! इतकी सुंदर आणि उत्कृष्ट मंदिरे अशा भग्न किल्ल्यात पाहणे म्हणजे एक पर्वणीच ठरते. भैरवनाथ, मल्लीकार्जुन, बालेश्वर आणि लक्ष्मीनारायण अशी चार मंदिरे असून या सर्वात लक्ष्मी-नारायण मंदिराची मात्र बात काही औरच आहे.महाराष्ट्रात असलेल्या प्राचीन मंदिरापैकीच एक असणा-या या लक्ष्मीनारायण मंदिराचे कौतुक करायचे झाल्यास एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल. हे नितांत सुंदर मंदिर भगवान शंकराच्या बालेश्वर मंदिरासमोरच उभं आहे. सध्या या दोन्ही मंदिरांच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाने ताबा घेतला आहे. ही निश्चितच सुखावह गोष्ट आहे. या दोन्ही मंदिराजवळच हत्तीच्या दोन मोटी दिसतात.यावर अजूनही पाणी वाहून नेण्यासाठीच्या पाईपची तोंडे दिसतात. या मोटींच्या पलीकडेच औरंगजेबाचा वास्तव्य असलेला इमारतींचा परिसर आपल्याला दिसतो. भली मोठी कमान, मोकळे पटांगण, नंतर दगडी चौथरा व याच्याच मागे दोन मजली वाडा दिसतो. हा वाडा ब-यापैकी शाबूत आहे. संपूर्ण चुन्याचा गिलावा केलेल्या या इमारतीतून भीमा नदीचे पात्र खूपच सुंदर दिसते.जेव्हा शंभूराजे आणि कवी कलश यांना पेडगावात आणले, तेव्हा या दोघांची औरंगजेबाशी भेट याच ठिकाणी झाल्याचे सांगितले जाते. अत्यंत हालहाल करून शंभूराजेंची कुप्रसिद्ध धिंड काढून रक्ताने माखलेल्या शंभूराजेंना बघून औरंगजेबाच्या आनंदाला पारावार उरला नाही, तेव्हा मंचकावरून उठून त्याने जमिनीवरच नमाज पढला. औरंगजेबाचे हे कृत्य पाहून कवी कलशाने शीघ्र कविता केली. ती कविता अशी होती
,‘‘यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग।लहु लसत सिंदुर सम, खुब खेल्यो रणरंग।ज्यो रवि छबी लखतही खद्योत होत बजरंग।त्यो तुव तेज निहारी के तख्त तज्यो अवरंग।।’
या कवितेचा अर्थ असा होता की, ‘‘रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमानाला बांधून आणले होते, त्याप्रमाणे संभाजी महाराजांस औरंगजेबासमोर उपस्थित करण्यात आले आहे. हनुमानाच्या अंगाला जसा शेंदूर शोभून दिसतो तसे घनघोर युद्धामध्ये रक्ताने अंग माखल्याने हे राजन, ते तुला शोभून दिसत आहे. ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणे तुझे तेज पाहून औरंगजेबाने आपल्या सिंहासनाचा त्याग केला आहे.’’या अशा गंभीर प्रसंगातही कवी कलशाने कविता सादर करून संभाजी राजांचा कणखर व बाणेदारपणा औरंगजेबासमोर दाखविला. या भेटीनंतर औरंगजेबाने शंभूराजेंना आणि कलश यांना तुळापूरला हलवले. या सा-या घटना येथे आठवल्या की अंगावर अक्षरश: काटाच उभा राहतो. शत्रूच्या तावडीत सापडलेल्या व साक्षात मृत्यूसमोर असतानाही शंभूराजेंचा जाज्वल्य स्वाभिमान, अविचलपणा, संयमीपणा या बहादूरगडाच्या मातीने पाहिला.असो अशा दु:खद आठवणीत बुडालेल्या या गडाच स्थान प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात मोलाच आहे. परंतु सध्या गडाची अवस्था तोळामासाचीच आहे. गडाचं प्रवेशद्वार, मंदिर, वाडा अशा काही इमारती सोडल्या तर हा भुईकोट अखेरचीच घटका मोजत उभा आहे. पण तरीही आजही आपण या गडावर आलो की शंभूराजांच्या प्रसंगाची आठवण येऊन मन अगदी गहीवरून येते.शंभूराजांनी दिलेल्या स्वराज्याच्या योगदानाचा हा गड साक्षीदार राहिला होता. देशाच्या रक्षणासाठी मराव कस हे या गडाने पाहिल होत. आजही येथल्या मातीला हात लावला तर कदाचित तुम्हा-आम्हाला ती भावना जाणवेल देखील!आपण कित्येक गड-किल्ले पालथे घालत असतो, पण या गडाची मात्र बातच वेगळी आहे. शंभूराजांच्या बाबतीत घडलेल्या दुर्दैवी प्रसंगाची काळी किनार आपल्या मनाला भावुक करीत असते. त्यामुळेच गड पाहून परतताना पावले जड झालेली जाणवत असतात.🙏🙏

सचिन भांड
सह्याद्रि ट्रेकर्स
श्रीरामपू

No comments:

Post a Comment

देवभूमी यात्रा

  ​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ​‘मनात भक्ती...