Monday, February 20, 2023

सह्याद्रि परिवार, शिवजयंती उत्सव २०२३


 महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांचा जन्मदिन....जवळपास पावणेचारशे वर्षांपूर्वी सह्यपर्वतावर एक निश्चयाचा महामेरू अवतरला, तो युगपुरूष हातातली भवानी तलवार उपसत उच्चारता झाला, "ये राज्य व्हावें, ही तो श्रींची इच्छा !" शिवरायांचे नाव घेतल्याखेरीज आमचा दिवसही जात नाही. मग शिवजयंती,तिची तारीख- वार-तिथी तर औपचारिकता ठरते.


  शिवजयंती साजरी करायची म्हणजे आज आम्ही महाराजांच्या तसबिरीला, मूर्तीला किंवा पुतळ्याला हार वाहतो. मोठमोठ्याने घोषणा देतो. याहीपुढे जाऊन कोणी उत्साही लोक हातात भगवे घेऊन गावभर फिरत राहतील. डिजे लावून नाचणाऱ्यांच्या विकृतीवर मात्र त्वरीत उपचार होणं गरजेचे आहे.; पण मला प्रश्न असा पडतो, की शिवचरित्राची पोच खरंच आज किती भारतीयांना आहे ?

खरं तर माझा प्रश्नच चुकला ! भारतीय म्हणण्याआधी फक्त महाराष्ट्राचा विचार करायला हवा. ज्या युगपुरूषाची नोंद तत्कालिन जागतिक राजकारणात घेण्यात आली, आज भारतभर त्याची धड ओळखही नाही. आपला इतिहास आपल्यालाच माहीत नाही यापेक्षा दुसरे आपल्या कर्मदरिद्रीपणाचे कुठले लक्षण सांगणार? हे एवढं या ठिकाणी सांगावेसे वाटते याला कारण म्हणजे काल परवा असच एका शाळे मध्ये शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून जाण्याचा योग आला तिथे मुलांना काही  महाराजां च्या विषय अगदी सोपे प्रश्न विचारले पण त्यांची उत्तरे ऐकून तर अगदी अवाक च झालो पण त्यात त्या निरागस मुलांची काही चूक नाही म्हणा  याला एकमेव  कारन म्हणजे दिवसेंदिवस इतिहास च्या पुस्तकातून एक एक पान कमी होत जाण अहो इतकच काय पण आपला इतिहास जो काही समजतो तो या गड किल्यांच्या मधून च पण आज काल ह्या मुलांना शाळा घेऊन जाते ती so called picnic स्पॉट ला अहो पण तिथे तुम्ही तुमची फॅमिली पण घेऊन जाऊ शकता ना एक काळ असा होता की सहल म्हंटल की ती फक्त गड किल्ले वर असायची इतकेच काय लहान मुले तर सोडाच पण जेव्हा आम्ही असे गड किल्यावर जातो तिथल्या प्रत्येक वास्तू ला तिथल्या शैलीला एक विशिष्ट प्रकारचे नाव असतात ती वास्तू तिथेच का अशीच का त्या मागची अनेक कारण असतात हे आपण जाणून घेतो का म्हणून च खर तर या शिवजयंती ला हे सर्व विस्तृत पणे मला आपणा समोर मांडायचे होते पण वेळेअभावी ते मांडता नाही आले कारण अस  वाटायला नको आपण नुसतेच किल्ले सर करतो फोटो काढतो अन झाला आमचा गड पूर्ण असो परत कधीतरी तो योग् येईलच पण ती कमी आपल्या दोन छोट्या शिवकण्न्या यांनी महाराजांचे विचार आणि ते विचार आज आपण किती अमलात आणतो हे सांगताना खर तर अंगावर अक्षरशः शहारे येत होते.त्यात च योगायोगाने माझ्या आयुष्यात दोन व्यक्ती अशा आहेत त्यातील पहिली म्हणजे माझ्या जडणघडणी मध्ये जीचे अमूल्य स्थान आहे त्या आमच्या मातोश्री आणि दुसरे म्हणजे महाराज आज त्यांच्याच जयंती निमित्त मातोश्री ची आपल्या परिवाराची भेट व्हावी या सारखा माझ्यासाठी दुर्मिळ योग् कुठला नसावा तिच्या बद्दल किती ही लिहिले तरी कमीच आहे तिचा अध्यात्मिक अभ्यास किती आहे तिच्या वाणीतून आपणा समोर आलाच असेल. त्यातच महाडिक कुटुंबांचे आदरातिथ्य म्हणजे आपल्या घरात पण कुणी करणार नाही इतके ते करतात.

 मराठ्यांचे हे स्वराज्य ही केवळ शिवरायांची वैयक्तिक महत्वकांक्षा नव्हती; ते स्वराज्य होते, रयतेचे राज्य होते. धर्मवेड्या औरंगजेबाकडे ही समज नव्हती. शिवरायांनी माणसं जोडून स्वराज्याचे शिलेदार घडवले; कपटी औरंगजेब स्वतःपासून माणसं तोडत राहिला आणि मोगल सत्तेच्या नाशास कारणीभूत ठरला. शिवशाहीची हीच पोच महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्यांमध्ये राहिली नाही आणि आपण आपले स्वराज्य गमावून बसलो.म्हणूनच आपण हे गड किल्ले फिरत च राहू अशीच आपल्यासारखी  माणसे जोडत राहू  पण त्याच बरोबर असे कार्यक्रम घेऊन आज आपली छोटी मुले रुद्रा,ओम,वेदांत आज पुढे येऊन काहितरी बोलू लागलीत ही एक आपल्यासाठी अभिमानाची बाब आहेच असेच नवीन पिढी साठी नक्कीच आपले हे प्रयत्न प्रेरणादायी घडावे इतकीच अपेक्षा.

पुनःस्च एकदा आपण सर्व जण आवर्जून ह्या शिवजयंती उत्सवात हजर राहिलात त्या बद्दल सह्याद्रि परिवाराच्या वतीने आभार मानतो.


सचिन भांड

सह्याद्रि ट्रेकर्स परिवार



Sunday, February 12, 2023

एक वैभवशाली साम्राज्य (भाग ०२)

 


हम्पी बदामी टूर २०२२

दिवस तिसरा

ऐहोळे, पट्टदकल, बदामी


दोन दिवसांच्या बऱ्यापैकी पायपीटी नंतर आमचा तिसरा दिवस उजेडला तो सकाळच्या चार च्या गजर ने कारण सकाळी लवकरच आम्ही बदामी ला निघणार होतो.

बदामीचे मूळ नाव वातापी. प्राचीन काळापासून हे शहर एक महत्त्वाचे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र होते. या नावामागची कथाही रंजक आहे. कोणे एके काळी इथल्या डोंगरांत वातापी नावाचे दोन असुर बंधू राहत होते.त्यावरून च या शहराला वतापी हे नाव पडले व कालांतराने बदामी असे संभोदन्यात आले.

साधारण इसवी सनाच्या पाचव्या शतकात उदयास आलेले चालुक्य साम्राज्य दक्षिण भारतातले एक महत्त्वाचे साम्राज्य समजले जाते. बदामीचे भौगोलिक, आर्थिक, व सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन चालुक्य सम्राट पुलकेशीन-१ याने आपली राजधानी इथे वसवली. इथली गुंफा मंदिरे, इतर देवालये, आणि किल्ल्यांची उभारणी त्याच्याच काळात झाली. पुढे पुलकेशीन-२ याने आसपासच्या इतर राजवटींचा पराभव करून उत्तरेस नर्मदा नदीपर्यंत चालुक्य साम्राज्याचा विस्तार केला. सुमारे तीनशे वर्षं चालुक्य साम्राज्याने दक्षिण भारतावर आधिपत्य गाजवले. कालांतराने आठव्या शतकात अंतर्गत यादवी व फितुरी यांमुळे या साम्राज्याचा अस्त झाला. चालुक्य राजांनी आपल्या कार्यकाळात दक्षिण भारतातली मंदिरस्थापत्यकला भरभराटीस आणली. त्या काळात बांधली गेलेली एकापेक्षा एक अशी सुबक मंदिरे आजही त्या गतवैभवाच्या खुणा सांगत दिमाखाने उभी आहेत. 

अशा या राजवटीमधल्या राजांचे योगदान बघायचे असेल तर बदामी, ऐहोळे आणि पट्टदकल इथे भेट द्यायलाच हवी. लेणी आणि मंदिर स्थापत्याची विविध अंगे, तसेच कमालीच्या सुबक मूर्ती यांचे मोठे भांडार म्हणजे ही तीन ठिकाणे होत. चालुक्यांची राजधानी असलेले बदामी आणि तिथल्या लेणी आणि जवळच असलेली ऐहोळे आणि पट्टदकल ही ठिकाणे म्हणजे चालुक्यांचे वैभव आहे. आज हे वैभव निव्वळ स्थापत्यरुपात आपल्यासमोर उभे असले तरीसुद्धा इथली मंदिरे, त्यावरील मूर्ती आपल्याशी संवाद साधतात. अभ्यासकांना, तज्ञांना अवाक करणारे इथले स्थापत्य सर्वसामान्य पर्यटकाशी सुद्धा तेवढ्याच आत्मीयतेने बोलते, संवाद साधते.

त्या मंदिरांची भेट कधी एकदा घडतेय याची कमालीची उत्सुकता माझ्या मनात होती.

हम्पी वरून साधारणपणे 145 किलोमीटर असलेल्या बदामी च्या अगोदर आपण पोहचतो ते ऐहोळे या गावी त्या नंतर पट्टदकल या गावी

ऐहोळे-

ऐहोळे या गावाविषयी अशी एक दंत कथा सांगितली जाते की भगवान परशुराम यांनी आपले वडील जमदग्नी ऋषी यांचा बदला घेतल्यानंतर परशुरामाने रक्तलांछित वस्त्र मलप्रभेच्या पात्रात धुतले तेव्हा नदीचे पाणी लालभडक झाले. नदीचे पाणी भरण्यासाठी आलेल्या नारीनी हे दृश्य बघितले व ते पाहून त्यांच्या तोंडात आश्‍चर्याने उद्गार आले- ‘ऐ… होळे… ऐ… होळे…’ त्यामुळेच गावाचे नाव ‘ऐहोळे’ असे झाले अशी आख्यायिका सांगितली जाते. ग्रामनामासंदर्भात कितीही कथा, दंतकथा असल्या तरी बदामी चालुक्याच्या राजवटीत ‘ऐहोळे’ येथे अग्रहार आणि विद्याकेंद्र होते. 

ऐहोळे मंदिर समूह म्हणजे भारतीय वास्तुशास्त्राची शाळा समजली जाते. चालुक्य स्थापत्यशैलीचा आद्य आविष्कार, तसेच तिच्या उत्क्रांतीचे सारे टप्पे येथील मंदिरावशेषांमध्ये दिसतात. गेट मधून प्रवेश केल्यावर पहिलेच तुम्हाला आकर्षित करणारे दुर्गादेवी मंदिर दिसते. दुर्गामंदिर आयताकृती असून शिखर शंकूसारखे व मंदिराची एक बाजू अर्धवर्तुळाकृती आहे. दिल्लीतल्या संसद भावनासारखी दिसते. मलप्रभेच्या काठावरती कर्नाटकातील बर्‍याच राज्यकर्त्यांनी आपल्या गौरवाला साजेल अशी मंदिरे उभारली. कला-संस्कृतीच्या जतन-संवर्धनाला, तिच्या उन्नतीला चालना दिली, तिला राजाश्रय प्रदान केला. दोन दिवसांपासून नुसतीच मंदिरे पाहत असलो तरी आज या वैभवशाली ठेव्याची प्रचिती प्रत्येक ठिकाणाहून येत होती.



तसेच येथील दुसरे महत्वाचे मंदिर म्हणजे लाडखान मंदिर नाव जरी विचित्र वाटत असले तरी असे सांगितले जाते लाडखान नावाचा कोणे राजपूत बराच काळ इथे वास्तव्यास होता म्हणून या विष्णु च्या मंदिरास लाडखान मंदिर असे म्हंटले जाते.



ऐहोळे बघून झाल्यावर आम्ही आमचा तांडा ऐहोळे पासून केवळ 12 किलोमीटर असलेल्या पट्टदकल कडे वळवला ऐहोळे प्रमाणेच पट्टदकल चा मंदिर समूह म्हणजे अदभूत च


पट्टडकल

               पट्टडकल हे ठिकाण म्हणजे एकाच ठिकाणी असलेल्या अनेक मंदिरांचा समूह.  पट्टडकलच्या आवारात असलेली मंदिरांची नाव खालीलप्रमाणे

१ ) काडसिद्धेश्वर मंदिर

२) जांबूलिंग मंदिर

३) गलगनाथ मंदिर

४) संगमेश्वर मंदिर

५) विरुपक्ष मंदिर

६) मल्लिकार्जुन मंदिर

७) काशीविश्वेश्वर मंदिर














१) काडसिद्धेश्वर मंदिर

       कडसिद्धेश्वर मंदिर हे पट्टडकल मधील गलगनाथ मंदिराशेजारी असलेलं एक मंदिर आहे. कडसिद्धेश्वर नामक एक संन्यासी इथे राहत असल्याकारणाने ह्या मंदिरास "काडसिद्धेश्वर मंदिर" म्हणून संबोधले जाते. झालेल्या पडझडीमुळे ह्या मंदिराचं शिखर हे तुटलेल्या अवस्थेत आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस शिव हरिहर आणि अर्ध नारेश्वर च शिल्प चित्रित करण्यात आलं आहे.





काडसिद्धेश्वर मंदिर

२) जांबूलिंग मंदिर

         जांबूलिंग मंदिर हे नागर शैलीत बनवलं गेलेलं मंदिर आहे. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या कळसावर असलेले नटराजाचं अप्रतिम शिल्प.


जांबूलिंग मंदिर

३) गलगनाथ मंदिर

       आठव्या शतकात बांधलेलं हे मंदिर पूर्वाभिमुख आहे हे मंदिरसुद्धा नागरशैलीत बांधलं गेलं आहे मंदिराच्या बाहेरील बाजूस प्रदीक्षिणेस प्रशस्त जागा आहे प्रवेशद्वारावर नटराजाचं अनोखा शिल्प आहे.


गलगनाथ मंदिर

४) संगमेश्वर मंदिर

       संगमेश्वर मंदिर हे आठव्या शतकाच्या आसपास बांधलं गेलेलं एक शिवमंदिर आहे. हे मंदिर बांधण्यासाठी चालुक्य राजा विजयादित्य ह्याने प्रचंड मेहनत घेतली म्हणून ह्या मंदिरास विजयेश्वर मंदिर म्हणून सुद्धा ओळखलं जातं.


विरुपाक्ष मंदिर

         विरुपाक्ष मंदिर हे इ. स. ७४० मध्ये द्रविड शैलीत स्थापन केलेलं असून हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. ह्या मंदिराची स्थापना लोकमहादेवी नामक राणीने आपल्या पतीच्या कांची विजयाच्या आठवणीत बांधले आहे म्हणून ह्यास लोकेश्वर मंदिर म्हणून संबोधतात. मंदिराच्या पूर्व द्वारासमोर असलेल्या मोठ्या प्रांगणात काळ्या दगडात कोरलेली एक भव्य नंदीची मूर्ती आहे. मंदिराच्या दरवाज्यापाशी दोन्ही बाजूस द्वारपालाची शिल्प आहेत व आजूबाजूस शृंगारिक जोडप्यांची शिल्प रेखीत करण्यात आली आहेत.


विरुपाक्ष मंदिर

६) मल्लिकार्जुन मंदिर

         मल्लिकार्जुन मंदिर हे विरुपाक्ष मंदिराच्या अगदी जवळ आहे. हे एक शिवमंदिर आहे शंकराला त्रैलोकेश्वर सुद्धा म्हंटलं जातं. हे मंदिर विक्रमादित्य च्या महाराणी त्रैलोक महाराणी ने आपल्या पतीच्या विजयाला स्मरून निर्माण केलं होतं.


मल्लिकार्जुन मंदिर

७) काशीविश्वेश्वर मंदिर

            काशीविश्वेश्वर मंदिर हे मल्लिकार्जुन मंदिराच्या बाजूस असलेले मंदिर. ह्याची बाहेरील बाजूस असलेली सजावट अप्रतिम आहे. उत्तरी शैलीतल्या असलेल्या मंदिराच्या कळसावर शिव नृत्य करीत असल्याचे शिल्प आहे बाहेरील बाजूस शिव पार्वती अर्धनारेश्वर ह्यांची शिल्पं आहेत.


पट्टदकल आणि ऐहोळे येथील ऐतिहासिक मंदिरे पाहून आम्ही आता काही वेळात च बदामी इथे पोहचलो आता एव्हाना बऱ्यापैकी पोटात कावळे कोकत च होते आणि विश्वास बसणार नाही इतके रुचकर जेवणाचा आनंद घेऊन आम्ही बदामी च्या लेण्या बघावयास निघालो.







या गावाचा परिसर मोठमोठ्या शिलाखंडांनी युक्त असा असून त्यापैकी गावापासून जवळच असलेल्या अगस्ति तलावाशेजारील मोठया टेकडीवर पाषाणात ही लेणी कोरलेली आहेत . भारतीय पुरातत्व विभागाकडून देखभाल केली जात असलेल्या या लेण्यांच्या सभोवतालचा भाग अगस्ती तलाव व भूतनाथ मंदिर समूह यांनी व्यापलेला आहे .या लेण्यांकडे काही पाय-या चढून जावे लागते . एका अखंड डोंगरात खोदकाम करून ही लेणी तयार करण्यात आली आहेत . या लेण्यांमधील लेणी क्रमांक 1 मध्ये शिव व इतर हिंदु देव देवता लेणी क्रमांक 2 व 3 मध्ये  विष्णु व विष्णुचे विविध अवतार तसेच  रामायण काळातील  प्रसंग व यक्ष किन्नर,नर्तकी असे  दाक्षिणात्य पध्दव्तीच्या मुर्ती खांबावर , दर्शनी भिंतीवर तसेच खांबाला आधार देणा-या तुळया व छत यावर कोरलेल्या आहेत . लेणी क्रमांक 4 मध्ये जैन शिल्पे आहेत .जवळपास दीड हजार वर्ष झाली या कोरीव शिल्पांना ! पण आजही सुस्थितीत आहेत .  महिषासूर मर्दिनी व शिव पार्वती शिल्पे सुबक व सुंदर आहेत. हा मंदिर समूह सुंदर देवालये व स्वच्छ परिसर यामुळे विलोभनीय वाटतो .आता बऱ्यापैकी अंधार पडवयास सुरवात झालीच होती आणि आमची ही अशी  सुंदर तीन दिवसांची हम्पी बदामी ट्रिप पूर्ण करून आम्ही मार्गस्थ झालो खर तर हम्पी बदामी चा मनापासून जर अभ्यास करावयाचा झाल्यास तुम्हाला आठ दिवस सुद्धा कमी पडतील यात मात्र तीळ मात्र शंका नाही.असो माझ्या ह्या दोन्ही भागातील ब्लॉग मध्ये माझ्या नेहमीच्या ब्लॉग प्रणाने प्रवासवर्णनाला प्राधान्य न देता ऐतिहासिक स्थळाची माहिती देण्यावर मी जास्त भर दिला नाहीतर नुसतेच एखाद्या पिकनिक सारखी ही टूर झाली असती.

वरील सर्व संदर्भ हे मी आशुतोष बापट यांच्या सफर हम्पी-बदामी या पुस्तकाच्या आधारे आणि तिथे पुरातत्व विभागाने लावलेल्या माहितीच्या आधारे  घेतलेला आहे.


धन्यवाद🙏🏻

सचिन भांड 

सह्याद्रि ट्रेकर्स परिवार, श्रीरामपूर

sahyadritrekers.blogspot. com

Friday, February 10, 2023

एक वैभवशाली साम्राज्य (भाग -०१)

 


सह्याद्रि ट्रेकर्स परिवार आयोजित हम्पी बदामी टूर (भाग-०१)

दि.३ ते ५ फेब्रुवारी 2023

कोण्या वास्तुविशारद ला पहाटे एक कोवळे स्वप्न पडले आणि त्याने अशी जगप्रसिद्ध शिल्पांनी सजलेली सारी नगरीच सजवली. हंपी मधील विठ्ठल मंदिर पाहताना असंच काहीसं वाटत होतं . ग. दि. माडगूळकर ह्यांनी लिहलेला "कानडा राजा पंढरीचा" हा अभंग सारखा मुखी वाहत होता. इथला विठ्ठल हल्लेखोरांच्या भितीनं महाराष्ट्रातल्या पंढरपूरात नेऊन लपवला अशी एक दंतकथा सांगितली जाते म्हणून कानडा राजा पंढरीचा. हजारो मंदिरे असलेल्या हंपी - बदामी मध्ये कुठल्याच देवळात आता पूजा होत नाही हे एक आश्चर्यच आहे. ह्या कथेला असामान्यतेची किनार आहे. या मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर देवांनी स्वत:च या देवळात रहाण्यासाठी ठाम नकार दिला. कारण, हे मंदिर फारच भव्य आणि सुंदर असल्यानं देवांना इथं राहायला संकोच वाटला असता.

            हंपी- बदामी हे जगातलं सर्वात मोठं ओपन एअर म्युझियम पहायला जायचं हे एक प्रत्येक फोटोग्राफर च स्वप्न असत बऱ्याच वेळेस ठरलं तेव्हा प्लॅन फक्त कागदावरच होता. पण कालांतराने एक गोष्ट जाणवली ही टूर म्हणजे एकट्या दुकट्या ने करण्यासारखी वाटत नाही म्हणून ग्रुप च घेऊन जायचा हे ठरवलं केवळ पंधरा च दिवस उरले असले तरी हंपी-बदामी बाबत अनभिज्ञच होतो. जेवढं वाचलं होत त्यावरून येथील स्थळांची मनात भेळ होत होती. कुठे आधी जाव कुठे नंतर जाव ह्यात डोक्याचा भुंगा झाला होता. अनेक जाणकारांना आणि आधी जाऊन आलेल्यांना त्रास द्यायला सुरवात केली आणि रंगमंचावरचा पडदा हळू हळू उघडत जावा तसा हा प्लान मोकळा झाला.

माझा हा ब्लॉग प्रवास वर्णन ला जरासा फाटा देत ऐतिहासिक संदर्भावारील असेल कारण प्रवास वर्णन आणि ऐतिहासिक माहिती असे दोन्ही म्हंटल की ब्लॉग हा मोठा होतो.


भाग १ आणि भाग २ आशा ह्या स्वरूपात हा ब्लॉग असेल त्यात भाग १ मध्ये हम्पी च्या विषयी माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल आणि भाग २ मध्ये ऐहोळे, पट्टदकल, आणि बदामी या विषयी असेल.

हम्पी म्हणजे एकेकाळच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी. आज तेथील १५ ते २० किमी परिसरात भग्नावस्थेत असलेल्या विविध वास्तू पाहताना मन उद्विग्न होते.

कर्नाटक राज्यातील बेलारी तालुक्यातील होस्पेट या मुख्य बाजारपेठ असलेल्या गावापासून १३ किमी अंतरावर असलेले हम्पी म्हणजे एकेकाळच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी. आज हम्पी परिसरात भग्नावस्थेत उभे असलेले महाल, देवदेवतांच्या मूर्ती, विविध दगडी कमानी, स्नानकुंडे, बाजारचा मुख्य रस्ता, बाजूने दुकानांच्या जागा, आसमंतातील टेकडय़ा, माळरान हे सर्व पाहताना मन उद्विग्न होते. यामागचा भव्यदिव्य गौरवशाली इतिहास चलतपटाप्रमाणे आपल्या डोळ्यासमोरून सरकत जातो.

विजयनगर (विजयाची नगरी) हे दक्षिण भारतातील इ.स. १३ ते १५ व्या शतकातील बलाढय़ हिंदू साम्राज्य. राजा कृष्णदेवराय सम्राट असताना इ.स. १५०३ ते १५३० हा या साम्राज्याचा सुवर्णकाळ होता. त्याच काळात पोर्तुगीज प्रवासी डॉमीगो प्रेस हे शाही सम्राटाचे पाहुणे म्हणून हम्पीमध्ये राहिलेले. त्यांची रोजनिशी विविध भाषात उपलब्ध असून त्यातील वर्णन सुवर्णाक्षरात कोरून ठेवण्यासारखे आहे. ‘सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असलेले जगातील सर्वात उत्तम रईस शहर अशी त्याची ख्याती इराक-इराणपर्यंत होती.’ पर्शियन प्रवासी अब्दुल रझाक लिहितो, ‘‘माझ्या नेत्रांनी हम्पी इतके अप्रतिम शहर कुठेही पाहिलेले नाही किंवा त्याच्या तोडीचे दुसऱ्या कोणत्याही शहराचे नाव ऐकलेले नाही. अनेक टेकडय़ांवर वसलेल्या शहराला एकामागोमाग वर्तुळाकार बांधकाम केलेली सात कोटांची तटबंदी, भर बाजारात दिवसाढवळ्या चांदी, सोने, हिरे, माणके, केशर यांचे ढीगचे ढीग विक्रीसाठी. देशी परदेशी व्यापाऱ्यांच्या झुंडी याने बाजार फुलून जात असे. राज्याचा विस्तार थेट ओरिसापासून केरळपर्यंत होता. राजाजवळ सात ते आठ लाख खडे सैन्य होते. चलनात सोन्याची नाणी होती. विजयनगर म्हणजे सुवर्णनगरीच होती. पण इ.स. १५६० नंतर साम्राज्याची शोकांतिका सुरू झाली. इ. स. १५६५ तालीकोट (राक्षसतागडी) येथील बहामनी राज्ये व विजयनगर साम्राज्य यांच्यामधील घनघोर युद्धात विजयनगर राज्याचा दारुण पराभव झाला. शहरातील अनेक प्रासाद, देवळे, पुतळे, आलिशान घरे यांचा अघोरी नाश केला गेला. तलवारी, कुऱ्हाडी, हातोडे व दुसरे जे काही आयुध हाताला मिळेल त्याने अहोरात्र अघोरी कृत्य चालू होते. तीन महिने शहर लुटले जात होते. आगी लावून राजवाडे भस्मसात केले गेले. जे शिल्लक होते ते क्रूरकर्माच्या तोडण्यापलीकडचे होते. आजही त्या शिल्लक राहिलेल्या वास्तू दिमाखात उभ्या आहेत.’


१५ ते २० किमी परिसरात पसरलेल्या या उद्ध्वस्त शहरात आपणास जागोजागी दिसतात अजस्र शिळा. हम्पीचे विरुपाक्ष शिवमंदिर आठव्या शतकापासून १६व्या शतकापर्यंत या साम्राज्याचे मुख्य केंद्रस्थान होते. राज्याचा उदय आणि अस्त याच्या साक्षीने झाला. राज्याचा विध्वंस झाला, पण मंदिर पूर्णपणे सुरक्षित राहिले हा एक योगायोगच. पंपातीर्थ स्वामीस्थल या नावाने ते प्रसिद्ध आहे. मंदिराचे पूर्वेकडील गोपूर १०५ फूट म्हणजे जवळजवळ दहा मजले उंच आहे. मध्यात विस्तीर्ण आयताकृती प्रांगण. त्यात अनेक गोपुरे आहेत. कृष्णदेवरायांच्या काळात ‘राज्याभिषेक मंडप’ व सर्वात लहान गोपूर बांधले गेले. मंडपाला नक्षीकाम व अलंकाराने मढविलेले १०० खांब आहेत. अलंकारांनी मढविलेला नंदी आहे. त्यावर आरूढ गिरिजाशंकराची मूर्ती आहे. राम, कृष्ण, विष्णू व शिव या अवतारांच्या अनेक कथा शिल्प माध्यमातून जिवंत केलेल्या आहेत.



विजय चौक येथील प्रमुख राज्यकर्त्यांचा चौथरा ५३०० स्क्वे. फूट आहे. त्याला ४० फूट उंच कोरीव कामाची गॅलरी आहे. चौथऱ्यावरच्या पायाचे दगड अजूनही उत्तम स्थितीत आहेत. त्या काळात सर्व बाजूंनी गॅलरीला लाकडी खांबाचा आधार आहे. याला लागून दोन मजली भव्य हॉल ज्याला १०० खांब, दगडी जिने, आहेत. हिरव्या रंगाच्या क्लोराईट दगडाच्या चौथऱ्याला मागून शिरण्यास गोलाकार दगडी जिना आहे. बाजूने चोर खोल्या आहेत. या जागेवरून आपल्या राण्या व दासी या लवाजम्याबरोबर राजा विजयादशमी सोहळा पाहत असे. बाजूच्या भिंतीवर युद्धावर जाणाऱ्या सैनिकांचे जथे, देखणे घोडे, उंट, नर्तिका, पर्शियन टोप्या घातलेले लांब दाढीवाले परदेशी प्रवासी या सर्वाचे कोरीव कामातील देखावे पाहून आपण थक्क होतो. होळीच्या सणात नर्तिकांच्या हातात रंगाने भरलेल्या पिचकाऱ्या व त्यांच्या चेहऱ्यावरील दिसणारा जोश इतका जिवंत उभा केलेला आहे की जणू आपल्यासमोर खेळ चालू आहे असे वाटते. वाघ, बिबटे, नीलगाई, मगरी यांच्या शिकारीची शिल्पे, व शिकाऱ्याच्या चेहऱ्यावरचे भेदक क्रूर भाव अचूक टिपलेले आहेत.

राजाच्या पदरी असलेले लक्षावधी सैनिक, हजारो सजविलेले अरबी घोडे, हत्ती, संपूर्ण शस्त्रागार या विजय चौकात परदेशी पाहुण्यांसमोर समारंभपूर्वक दाखवले जात असे.



याला लागूनच दोन ते तीन हजार स्क्वे. फूट जागेत २५० फूट खोल पुष्करणी असून त्याला १०० ते १२५ आखीव पायऱ्या आहेत. राजा पवित्र मूर्तीना या कुंडात स्नान घालत असे. या कुंडाला लागून राजवाडय़ाच्या भग्नावशेषाचा भला मोठा ढीग पसरलेला दिसतो.


सासवकेलु गणपती मूर्ती मोहरीच्या दाण्यासारख्या दगडाची बनलेली असून जवळजवळ २० ते २२ फूट उंच आहे. तिच्या चारी बाजूंनी मखराचे खांब आहेत. समोर बसलेला मूषक वेगळ्या दगडाचा आहे. याच मूर्तीच्या पाठी गौरी ची मूर्ती रेखाटलेली आहे. ही मूर्ती १७ फूट अखंड दगडात कोरलेली आहे. तिच्या सर्व बाजूला विविध आकारांचे गुळगुळीत दगड पडलेले आहेत. बहुधा अर्धवट बांधलेल्या मंदिराचे दगड असावेत. या टेकडीवर असलेल्या गणपती मूर्तीच्या खालच्या बाजूस हम्पी बाजाराची जागा असून त्यामध्ये रुंद आखीव रस्ते व दोन्ही बाजूंस दुकानांच्या गाळ्याचे चौथरे आहेत तिथे हिरेमाणके उघडय़ावर विकण्यास असत. तेव्हा परदाओ हे सोन्याचे गोल चलनातले नाणे होते. त्याच्या एका बाजूस दोन प्राण्यांची चित्रे व दुसऱ्या बाजूस राजाची मुद्रा आहे. नाणी पाडणारी टांकसाळ एका भव्य बंदिस्त इमारतीत आहे. आज हा परिसर थडग्यासारखा आहे. एके काळी येथून सोन्याचा धूर शहरावर पसरत होता. 



लक्ष्मी नरसिंह-

 (उग्र नरसिंह ) 

हे २२ फूट उंचीचे भव्य शिल्प मूर्तिकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. विष्णूचा अर्धमानवी व अर्धसिंहाचे तोंड असलेला अवतार, सात तोंडी आदिशेषावर स्थानापन्न झालेला तर एका मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे. मूर्तीची तोडफोड अशी विचित्र झालेली आहे की लक्ष्मीचे फक्त हातच कमरेभोवती दिसतात. मूर्तीच्या आसपास पडलेले महाकाय आकाराचे दगड पाहिल्यावर लक्षात येते की हे संपूर्ण तोडणे किती कठीण होते. आणि म्हणूनच आजही हे शिल्प चांगल्या स्थितीत आहे. मूर्तीसमोर अखंड दगडातील शिवलिंग असून त्याचा तळ सतत पाण्याखाली असतो.


राणी महल

राणी महालाच्या आत शिरल्यावर मध्यात प्रशस्त पायऱ्या असलेला स्नानाचा भव्य हौद आहे. मध्यात कमळाच्या आकाराची कारंजी आहेत. चोहोबाजूंनी तीन मजले असलेल्या गॅलऱ्या आहेत. त्याला लागून राण्यांची दालने आहेत. या जागेत राण्या व दासी स्नानाचा आनंद लुटत.


लोटस महल

राजघराण्यातील स्त्रियांना एकत्रित राहण्याचा  महाल म्हणजे झेनाना तटबंदी. याची जाडी वरवर कमी होत गेलेली. कमानीवरील सर्व कोरीव कामाची बांधणी हिंदू मुस्लीम संस्कृतीचा उत्कृष्ट मिलाफ आहे. १४ कमानी इतक्या सरळ रेषेत आहेत की शेवटच्या कमानीतून दिसणारा उजेड अनुभवणे वर्णनातीत आहे. महालाच्या बाजूस दोन उंच टेहळणी बुरूज आहे. त्यातल्या विविध कोनाडय़ांतून चोहोबाजूंच्या प्रदेशावर कडक नजर ठेवता येत असे. महालाची बांधणी अशी केलेली आहे की बाहेरून आतील स्त्रियांच्या हालचाली अजिबात कळत नसत. या जागी पुरुषांना प्रवेश नसे व सुरक्षिततेची जबाबदारी तृतीयपंथी सेवकांची असे. दोन पोर्तुगीज प्रवाशांनी लिहिलेल्या रोजनिशीतील याबाबतचे वर्णन वाचताना आपल्या डोळ्यासमोर सुवर्ण महाल उभा राहतो. त्यामध्ये नृत्यशाळा होती ज्याला १०० खांब व प्रत्येकावर विविध नृत्यमुद्रा कोरलेल्या होत्या. महालात चांदीचे झोपाळे, व छताला सोन्याचा मुलामा, पलंगांना सोन्याच्या दांडय़ा व मोत्याचे जाळीदार नक्षीकाम, हा लिहून ठेवलेला दस्तऐवज विजयनगर इतिहासाचा मानबिंदू आहे.

कमळाच्या आकाराचा लोटस महाल हे अतिशय उत्तम स्थितीत राहिलेले शिल्प आहे. बदामी पिंगट रंगाच्या मुलायम दगडाचे खांब व कमानी मुस्लीम शिल्पकलेसारख्या तर लाकडी खिडक्या जैन पद्धतीने कोरलेल्या आहेत. छताला गोपुराच्या आकाराचे कळस आहेत. या जागी राण्या सांस्कृतिक कार्यक्रम पाहत.


हत्तींना ठेवण्याकरता हजार ते १२०० फूट लांब उत्तम दगडी महाल होता. ज्याला ११ मोठाली दालने होती. प्रत्येक दालनाचा घुमट वेगळ्या आकाराचा असे. नक्षीकामाची पद्धत प्रत्येकाची वेगळी असे. घुमटाच्या आतील बाजूने लटकवलेले अजस्र लोखंडी हूक, ज्याच्या आधाराने जाड दोरखंडाने हत्तींना बांधून ठेवत. या वस्तू समोरील भव्य दालनात माहूत व पहारेकरी राहात. राणी महालाइतकेच हत्ती महालाचे महत्त्व होते.


विठ्ठल मंदिर हे हम्पीमधील सर्वात भव्य दिव्य शिल्प आहे. जगातील एक महान शिल्प म्हणून याची गणना होते. विठोबा हे मराठी लोकांचे कुलदैवत. हे महाराष्ट्र भूमी बाहेर साधारणपणे दिसत नाही. विठोबा हा कृष्णाचा अवतार त्यामुळे पुरातन कालापासून पुजले जाणारे दैवत. इ. स. १५१३ ते १५६४ पर्यंत या मंदिराचा जीर्णोद्धार २३ वेळा झाल्याची नोंद आहे. मुख्य चौथरा अजस्र दगडाचा असून त्यावर मंदिर उभे असून त्याला तीन मुख्य दरवाजे आहेत. देवघरात विठ्ठलमूर्ती आहे. सर्व बाजूंनी लांब व्हरांडे आहेत. त्याच्या प्रत्येक खांबावर कोरीव काम आहे. भिंतीवर रामायण महाभारतातील रंगविलेले प्रसंग आहेत. प्रवेशद्वाराजवळ दगडी हत्ती काही भागात तुटलेला आहे. लागून अतिभव्य कल्याण मंडप आहे, ज्याच्या खांबांची गणती करणे कठीण आहे. प्रत्येक खांबावर विविध देवता व प्राण्यांची कोरीव शिल्पे आहेत. इथे राजघराण्यातील लग्ने होत असत.

मंदिर आवारात ३० ते ३५ फूट उंचीचा अतिभव्य कोरीव काम केलेला दगडी रथ असून तो प्रथमदर्शनी एकसंध दगडातून कोरलेला आहे असे वाटते, पण तो अनेक दगडांनी इतका व्यवस्थित सांधलेला आहे की ते सांधे बारकाईने पाहिल्याशिवाय दिसत नाहीत. रथाची अजस्र दगडी चाके व त्यावरील वर्णनातीत कोरीव नक्षीकाम, मधील आरीचा दांडा, रथाच्या दोन बाजूंस दगडी हत्ती. मध्यात दगडाची पण लाकडाचा भास होणारी शिडी आहे. एकेकाळी हा रथ फिरवीत असत. हम्पीचे हे एक महान शिल्प आहे. मंदिराच्या मागील बाजूस अनेक मोडलेल्या खांबांचा व तुटलेल्या मूर्तीचा भला मोठा ढिगारा असून त्यामधून कमलापुरा गावाकडे जाणारा जुना दगडी बझार रस्ता आहे.




हेमकुटा टेकडीवर जैन पद्धतीच्या मंदिरांचा समूह असून कळसाचा आकार पिरॅमिडसारखा आहे. त्यात हिंदू देवदेवतांच्या मूर्ती आहेत. जैन साधूंचे नग्न अवस्थेतील पुतळे, हत्ती, सिंह व विविध प्राण्यांचे केलेले कोरीव काम संमिश्र संस्कृतीचे दर्शन दिसते.येथून सूर्यास्त पाहण्याचा नजारा म्हणजे केवळ अवर्णनीय.



असे विजयनगर साम्राज्य व त्याचे भग्नावशेष याचे उत्खनन १८५६ मध्ये ब्रिटिश अभ्यासक ग्रॅहम ग्रीनलॉ यांनी प्रथम केले. त्या वेळच्या कामाचे त्यांनी काढलेले फोटो आजही पाहण्यास मिळतात. पण पुढील १०० वर्षे या सर्व कामाकडे दुर्लक्ष झाले. यानंतर पुढे १९७६ सालात भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे हम्पी राष्ट्रीय प्रकल्प आखला गेला. अनेक तज्ज्ञ व विजयनगर साम्राज्याचे अभ्यासक यांच्या मदतीने युद्ध पातळीवर काम सुरू झाले. ४० ते ५० किमी परिसरात एकाच वेळी उत्खनन चालू होते. काही वास्तू उत्तम स्थितीत होत्या, तर काहींची आधुनिक पद्धतीने डागडुजी केली गेली. या भव्य कामाचे रंगीत फोटो कमलापुरा म्युझियममध्ये पाहता येतात. १९८८ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा असलेले ऐतिहासिक साम्राज्य म्हणून मान्यता दिली व तेंव्हापासून हम्पी हे जगात एक महत्त्वाचे वारसा स्थान म्हणून नोंदले गेलेले आहे. इथे अनेक परदेशी व देशातील अभ्यासक भेट देतात,  त्यावरून बराच इतिहास कळण्यास मोलाची मदत झाली. राजा उत्तम कवी आणि साहित्याचा जाणकार होता. त्याचे संस्कृत ग्रंथ उपलब्ध नाहीत पण तेलगु भाषेतील त्याने लिहिलेले प्रसिद्ध काव्य अमुक्थम्ल्लदा विष्णूचीत्थामू हे आजही प्रचलित आहे.

सचिन भांड

सह्याद्रि ट्रेकर्स परिवार,श्रीरामपूर


https://drive.google.com/drive/folders/1_Z68ZXUWPsr8JIQyliUFwAtYguBNKXXX



देवभूमी यात्रा

  ​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ​‘मनात भक्ती...