Tuesday, October 19, 2021

Ratangad Trek

 सह्याद्रि ट्रेकर्स आयोजित,

रतनगड ट्रेक

17 oct.2021


      पावसाचा दीर्घ प्रवासा नंतर मनाला हुरहूर लागून जाते अन  तिकडे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून रानमाळावर रानफुलांचा रंगाच रंग उत्सव एन बहरात आलेला असतो.  निळ्याशार आसमंताच्या पार्श्वभूमीवर शुभ्र ढगांचं कोंदण तर लाजवाबच..! दूरदूरपर्यंतचे हिरवे मुलूखमैदान पूर्ण दृष्टिक्षेपात येणारा स्वच्छ सूर्यकिरणात न्हाऊन निघणारा तो साऱ्या सृष्टीचा अशा असामान्य वातावरणात आम्हा भटक्या मंडळींना वर्षभरातल्या ट्रेकिंगचं सेलिब्रेशन आणि नवरात्रानिमित्त सीमोल्लंघन करण्याचा मूड न आला तर नवलच!सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर विविध रंगांनी सजलेल्या माळरानांवर हे ट्रेकिंग सेलिब्रेशन किंवा दसऱ्या निम्मित सीमोल्लंघन म्हणा हवं तर, साजरा करण्याची काही अफलातून ठिकाणं या सह्याद्रीच्या कडे-पठाराकडे आकृष्ट करताहेत. त्यातलंच हे एक सह्याद्रीतलं अनमोल रत्न ‘किल्ले रतनगड’ वर्षभरात एकदाच सीमोल्लंघन करण्याची संधी नवरात्रोत्सवात मिळतेच मिळते. शास्रीयदृष्ट्या याला वेगळे आयाम प्राप्त असतीलही, मात्र आम्हा भटक्यांना सीमोल्लंघन म्हणजे आपला परिसर वा परिघाबाहेर डोंगरदऱ्यात भटकायला जाणं हेच.

रतनगड च्या इतिहासात डोकावल्यास हा गड कोणी आणि कधी बांधला हे निश्चित जरी नाही सांगता आला तरी पूर्वी हा गड निजामशाही च्या ताब्यात होता पुढे 1630 साली माहुलीचा तहात हा गड मोघलांच्या ताब्यात गेला नंतर 1660 साली महाराजांनी मोरोपंतांच्या मदतीने हा गड स्वराज्यात आणला 1664 साली जेव्हा महाराजांनी सुरतेची लूट केली तेव्हा काही काळ महाराज गडावर विश्रांतीस होते असा देखील उल्लेख आढळतो तद्नंतर 1680 साली मोघलांनी हा गड ताब्यात घेतला आणि 1720 साली शाहू महाराजांनी परत मराठी साम्राज्यात गड परत आणला पुढे पेशव्यांनी राजुर हा प्रांत तयार करून त्याचे मुख्यालय रतनगड तयार केले.परंतु नंतर 1820 मध्ये इंग्रजांनी गड ताब्यात घेऊन गडावरील संपत्ती जप्त करून गड सुरूंग लावून उद्धवस्त केला.
 असा हा रतनगड ट्रेक करण्याची कल्पना तब्बल चार वर्षा नंतर  मनात आली अन ती कल्पना मी आमचे ट्रेक सहकारी चंदन सर आणि उमेश यांच्याजवळ व्यक्त केली आणि क्षणाचाही विलंब न करता आमचे नियोजन चालू झाले.सुरवातीला मर्यादित क्षमतेने ट्रेक करण्याचा विचार होता परंतु इच्छुकांची संख्या पुढे वाढतच गेली आणि तो दिवस उजेडला पण आम्हा भटक्यांना बऱ्याच वेळेस अनेक संकटांना तोंड द्यावे लागते आणि त्यातून ही आम्ही योग्य मार्ग हा काढतोच आणि ह्या वेळेस जे संकट आले ते जरा विचित्रच होते म्हणजे आम्ही रात्री साडेबारा वाजता निघणार होतो परंतु अचानक आमच्या गाडीचा खोळंबा झाला आणि तेथून पुढे चालू झाली आमची खरी परीक्षा तिकडून गाडी मालकाने पंधरा मिनटं करता करता तीन वाजवले तरी गाडीचा काही पत्ता नव्हता एव्हाना आमच्या सदस्यांची जी चल बिचल चालू होती ती पाहून आमचा देखील अंगाचा भडका उडत होता साहजिकच आहे म्हणा आमच्या विश्वासावर ही मंडळी जेव्हा येते तेव्हा अशा काही गोष्टी झाल्या तर मनाला कुठे तरी ही रुक रुक  वाटतेच.शेवटी त्या गाडी मालकाला दुसरी गाडी सांगून आमचा प्रवास तब्बल साडेतीन तास उशिरा चालू झाला खरा परंतु सर्वांच्याच मनात एक हुरहूर लागून होती ती ही की आता उशीर झाल्यामुळे पुढे ट्रेक होतो की नाही अगदी काहींनी दुसरा पर्याय देखील सांगण्याचा प्रयत्न केला परंतु मला माझ्या अनुभवाच्या जोरावर  एक विश्वास होता की कितीही उशीर झाला तरी हा ट्रेक पूर्ण होऊ शकतो.अशा ह्या विचारांच्या गर्दीत आम्ही सकाळी नऊ वाजता आमच्या गाईड च्या घरी पोहचलो .तिथे चहा नास्ता आवरासावर करत सोबत वाटाड्या घेऊन आम्ही रतनवाडी कडे निघालो सुरवातीला आमचं नियोजन हे रतनवाडी कडून आरोहण करून त्रिंबक दरवाजाने गडउतार करायचं अस होत पण वेळे अभावी आम्ही नियोजनात बदल करून रतनवाडी कडूनच चढाई करून उतराई करायचे ठरवले. अन् पाऊले चालू लागली रतनगडच्या दिशेने.

 काही वेळातच दाट जंगलाच्या कुशीत विसावलेला अन् आपल्या अस्तित्त्वाचं निशान दाखवण्यासाठी उठावलेला रतनगड आव्हान देऊ पाहात होता. काही वेळातच खळखळणाऱ्या प्रवरेच्या नदीपात्राला ओलांडून झाडांचा सहवास सुरू झाला.. रहदारीची पायवाट.. आपलीशी वाटणारी ! जुनी-जाणती झाडं ओलावा धरून बसलेली. पुढे दमछाक करणारी चढाई . दीड दोन तासात एका चौफुलीवर विश्रांतीसाठी थांबलो.ती चौफुली म्हणजे पूर्वीच्या काळी प्रत्येक गडाच्या मध्यानवर जिथे सपाटीकरण असते त्या जागेला मेट म्हणतात मेट म्हणचे तो एक गडाचा आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास चेक पॉईंट असायचा तिथून एक   पायवाट कात्राबाई खिंडीकडे म्हणजे हरिश्चंद्रगडाकडे जाते अन एक रतनगडकडे. अन् तेथून पुढे तासाभराची जंगल चढाई करत आम्ही शिडी मार्गापर्यंत आलो. सावध पवित्रा घेत पहिल्या गणेश दरवाजापर्यंत आलो. माथ्यावर भैरोबाची मूर्ती कोरलेली आहे. तर डाव्या कातळावर गणेशाची मुर्ती. पुढे पायऱ्या चढत डावीकडच्या हनुमान दरवाजासमोर येऊन पोहोचलो. दरवाजातनं किल्यावर जाण्याचा मार्ग आहे. आम्ही तिकडे न जाता उजवीकडे गुहेकडे मोर्चा वळवला. पहिल्या लहानशा गुहेत रत्नादेवीची तांदळा प्रकारची सुरेख मूर्ती आहे अशी देखील आख्यायिका सांगण्यात येते की कळसुबाई ,कात्राबाई,आणि रत्नाबाई ह्या तीन बहिणी जिथे जिथे वास्तव्यात होत्या त्या वरून ह्या गडांची नावे पडली असावीत. पुढे मोठ्या गुहेत राहाण्यासाठी उत्तम सोय होऊ शकते. बाजूलाच थोड्या अंतरावर पिण्यायोग्य पाण्याचं टाक आहे. पुढे हनुमान दरवाज्यातनं माथ्यावर आलो. अन् काय आश्चर्य पिवळ्या जांभळ्या रानफुलांनी संपूर्ण गडमाथा बऱ्यापैकी सजला होता. त्यात उजवीकडे राणीचा हुडा बुरुज आकर्षित करणारा. बुरुजाच्या बाजूलाच स्वच्छ पाण्याचं टाक आहे. बुरुजावरून चौफेरचं विहंगम दृश्य न्याहाळत गडाच्या उत्तर-पूर्व बाजूकडे निघालो. थोड्याच वेळात काठावर आलो. चिलखती शैलीचा कातळ कोरीव बुरुज अन् तिथून दक्षिणेला आव्हान देणारा कात्राबाईचा आवाका फारचं भन्नाट दिसत होता. नुकताच पावसाळा संपल्यामुळे हिरवाईचा गालीचा कात्राच्या सौंदर्यात भर टाकत होता. सोबतीला लगट करणारे शुभ्र ढगांचे खट्याळ पुंजके मन वेडावून टाकत होते. पूर्वेचे रंग न्याहाळत आम्ही पश्चिमेकडे कूच केली. माजलेलं रानगवत कापत पश्चिम दिशेला आलो. खालच्या टप्प्यात कोकण दरवाजा अन् बाजूला तुडुंब भरलेली ६ कातळ टाकी किल्ल्याचं महत्त्व अधोरेखित करीत होती. फोटोग्राफीचा आनंद घेत उत्तरेकडे निघालो. पिवळ्या- निळ्या रानफुलांनी जणू गालिचा अंथरलेला अन् त्यातून जाणारी वाट काय सुख देत होती. तिरकस चाल ठेवत काही मंडळी नेढ्यात पोहोचले आणि काही त्रिंबक दरवाजा कडे. चारही बाजूंचं सृष्टिसौंदर्य बघून गलबलून गेल्यासारखं झालं. काय नजराणा पेश केला होता. निशब्द ! शांतता आणि सोबतीला अंगाला स्पर्शून जाणारा वारा.. समोर कात्राबाईच्या गगनचुंबी पहाडाला आपल्या कवेत घेणारे ढगांचे मायाजाल अवाक करत होते. भंडारदरा डॅमचं स्थिर जलसंचय शाश्वत जीवनातचं सूत्र सांगत होतं तर उत्तरेला अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई शिखर, रांगड्या सह्याद्रीच्या दराराचं प्रतिनिधित्व करत होती. त्र्यंबक दरवाजा म्हणजे अप्रतिम बांधकाम शैलीचा भरभक्कम दरवाजा नुकताच सह्याद्रि प्रतिष्ठान ने सुंदर नक्षीकाम केलेला दरवाजा बसावलेला आहे खरच सह्याद्रि प्रतिष्ठानच्या कामाला मनाचा मुजरा तेथिल कातळकोरीव पायरी मार्ग म्हणजे रतनगडच्या खुट्ट्याला वळसा मारून साम्रद वा रतनवाडीकडे जाणारा.तो पाहून आम्ही परतीला निघालो.कारण अंधार पडायच्या आत आम्हाला पायथ्याला पोहोचायचं होत जसजसे आम्ही पायथ्या पर्यंत पोहचत होतो तस तशी प्रकाशाची जागा आता आमच्या टॉर्च ने घेतली होती असा हा नाइट ट्रेक चा देखील आनंद घेत आम्ही रतनवाडी गावात पोहचलो. अन सर्वांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो पाहून तर आमचा देखील आनंद गगनात मावत नव्हता.

पुढे आमच्या गाईड च्या घरी सर्वांनी जेवणावर ताव मारून दिवसभरातलं रतनगडाचं अलौकिक सृष्टी सौंदर्याच्या आठवणींची कायमस्वरूपाची शिदोरी घेऊन प्रस्थान केलं.  



सचिन भांड.

सह्याद्रि ट्रेकर्स🚩

श्रीरामपूर      

  

Wednesday, September 1, 2021

आडराई जंगल ट्रेक

सह्याद्रि ट्रेकर्स आयोजित,

आडराई जंगल ट्रेक
 29 ऑगस्ट 2021




 ह्याद्रीच्या उंच उंच  रांगांमधून कोकणात  उतरणाऱ्या  पायवाटांची  जागा  आता सिमेंट डांबर  च्या  रस्त्याने बनत  चालली  आहे .त्यात  ही  नागमोडी  वळणे सरळ  होत  चालली दूरचा  प्रवास  कमी होत  चालला अशा  अनेक  प्रकारच्या  घाट रस्त्यामधील अनेकांना खुणावणारा माळशेज  घाट आणी  घाटाच्या  समोरील  असणारा  हरिश्चंद्र गड ह्या  दोन्ही डोंगरांच्या कुशीत वसलेलं खिरेश्वर हे  गाव ह्या गावाचे वर्णन करावयासे झाल्यास तीनही बाजूने हिरवीगार डोंगररांग आणी एका  बाजूस  विस्तीर्ण पसरलेला पिंपळगाव जोगा धरण. खिरेश्वर ला आल्यावर येथील डोंगररांगांच्या काळ्याभिन्न पाषाणाला जलधारा अखंडपणे  प्रेमाणे न्हाऊ घालतेय का  असा भास होतो. असे हे खिरेश्वर गावं आम्हा भटक्यांना तस नवखे नाही. कारण ह्या गावातूनच एक वाट  आम्हा भटक्यांची पंढरी असणाऱ्या हरिश्चंद्र गडावर जाते.

मागील तीन ते चार वर्षांपासून प्रकाश झोतात आलेलं आडराई जंगल म्हणजे आडवाटेवर देवाने बनवलेली वनराई.हा ट्रेक म्हणजे जंगलातून जाणारी पदभ्रमंती आणि सोबतीला असणारे असंख्य असे पांढरे शुभ्र धबधबे.असा हा ट्रेक करण्याची मनोमन इच्छा मागील वर्षांपासून मनात घर करून बसली होती परंतु सध्या आपल्या मानगुडीवर बसलेलं हे करोनाच भूत सुटता सुटत नव्हतं पण ह्या वर्षी हि पदभ्रमंती करायचीच ह्या उद्देशाने ह्या ट्रेक ची संकल्पना मी आमचे सहकारी चंदन सर आणि उमेश शिंदे यांच्या जवळ व्यक्त केली आणि 29 ऑगस्ट ची तारीख निश्चित करून पुढचे नियोजन चालू केले.सुरवातीला मोजकेच भटके नेण्याचं नियोजन पुढे जाऊन वाढतच गेलं त्यामुळे सुरवातीला सकाळी निघायचं नियोजन बदलून आधल्या दिवशी रात्री निघायचं ठरल.कारण संख्या जास्त झाल्याने पुढे सगळ्या गोष्टीत उशीर होऊ शकतो याची कल्पना मला आली.म्हणून ट्रेक च्या आधल्या दिवशी निघायचं ठरलं त्यात लहान मुलांना पण सोबत घेण्याचे ठरल्यावर जस जशी ट्रेक ची तारीख जवळ येत होती तस तशी  त्यांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचला होता.त्यात आम्ही देखील अपवाद नाही म्हणा.

अन बघता बघता तो दिवस उजेडला आणि  ठरल्या वेळेनुसार आम्ही श्रीरामपूर सोडून खिरेश्वर च्या दिशेने मार्गस्त झालो. रात्रीच्या किर्र अंधारात डोळे ताणून  जेव्हा पिंपळगाव जोगा धरणाच्या भिंतीवरून आमची गाडी निघाली तेव्हा तर आमच्या गाडीने धुक्याची चादर लपेटून त्यात गुडूप होण्याचा अनुभव देखील घेतला असा हा हलकासा गारवा अंगावर घेत पहाटेच्या वेळेत आम्ही खिरेश्वर गावात पोहचलो. तिथे पोहचल्यावर आमचा गावातील सहकारी उमेश उंडे आमची वाटच पाहत होता आणि नेमके त्याच्या घरी जात असताना रस्त्यात आमच्या एका गाडीचे चाक गाळात फसले आणि आता चांगलीच कसरत करावी लागणार होती परंतु आम्हाला नेहमीच असा अडचणीच्या वेळेस आम्हाला साथ देणारा रोप गाडी बाहेर काढण्यासाठी  कामी आला. नंतर गाडीतच थोडा आराम करून दिवस उजेडण्याची वाट पाहत होतो. जस जसा उजेड पडत होता तसतसा श्रावण सरींनी भिजणारा सह्यगिरी चे विलोभनीय दृश्य डोळ्यांप्रमाणे मनालाही चैतन्य देत होता.

थोडा उजेड पडल्यावर आम्ही उमेश च्या घरी फ्रेश होऊन मनमुराद चहा पोहे चा अस्वाद घेऊन intro round ला उभे राहिलो सगळ्यांची ओळख करून झाल्यावर ग्रुप मोठा असल्याने आम्ही  दोन  ग्रुप केले  त्या प्रमाणे अनुभवी भटके हे चंदन सर लीड करणार होते  आणि बाकीचे मी करणार होतो अशा प्रकारे दोनही ग्रुप आडराई जंगल पद भ्रमंती करण्यास मार्गस्त झालो जस जसे पुढे जात होतो तसतसे निसर्ग आम्हाला पुढे येणाऱ्या विलोभनीय दृश्यांची अनुभूती देत होता

पुढे चालत आल्यावर एका पठारावर आम्ही आलो तिथे सर्वांनी फोटोग्राफी चा आनंद घेतला पुढे जंगलाच्या दिशेने निघालो आता खर वाटायला लागले याला देवाची वनराई का म्हणतात कारण अजस्र्र असे वृक्ष वेली पाहून असे वाटते खरच आपण आपल्या स्वार्थासाठी किती निसर्गाची हाणी करतोय पुढे चालत गेल्यावर आम्ही reverse water fall जवळ आलो पण सध्या पाऊस वारा काही नसल्याने ते मोहक दृश्य पाहण्यास आम्ही मुकलो पुढे शेवटच्या टप्प्यावर पाण्याच्या प्रवाहात सर्वांनी अगदी लहान मुलांसारखे होऊन मनसोक्त आनंद लुटला त्या नंतर आल्या त्या मार्गाने परतीचा प्रवास चालू केला तेथून आम्ही ज्या धबधब्याची वाट पहात होतो तो म्हणजे काळू नदीवर निसर्ग निर्मित 1200 फुटांवरून कोसळणारा  काळू धबधबा  त्याचं सौंदर्य पाहून सर्वानीच वेगवेगळ्या पोजेस देऊन फोटोग्राफी चा आनंद घेतला. एव्हाना आता सर्वांच्याच पोटात कावळे ओरडण्यास सुरुवात झालीच होती म्हणून आम्ही तिथून उमेश च्या घरी पोहचलो आणि सर्वानीच त्याच्या सुंदर अशा जेवणावर ताव मारून उमेश चा निरोप घेतला आणि  नियोजित वेळेत सुखरूप  आम्ही श्रीरामपूर कडे छानश्या आठवणी सोबत घेत प्रस्थान केलं. फक्त एकच खंत मनात राहिली वरून राजा आज काय आम्हाला प्रसन्न झाला नाही. 

असा हा निसर्गाने भरभरून दिलेला ट्रेक प्रत्येकानेच एकदा तरी करावा.🚩🚩🚩🚩

सचिन भांड

सह्याद्रि ट्रेकर्स

श्रीरामपूर,

Saturday, July 17, 2021

भैरवगड,(शिरपुंजे) ट्रेक

 भैरवगड ट्रेक🚩

भैरवगड (शिरपुंजे), अकोले, नगर जिल्हा.

गडाचा प्रकार- गिरीदुर्ग

डोंगररांग- घनचक्कर

गडाची उंची- ३७९२ फूट

श्रेणी- मध्यम

आजमितीस कोरोना या महामारी सदराखाली आपण सर्वजण एका विशिष्ट प्रकारच्या महाभयंकर गुलामीच्या आणि मरणासन्न परिस्थितीकडे वाटचाल करीत आहोत. त्यात आमच्या सारखे भटके देखील होरपळून निघत आहोत महिन्यातून एक दोनदा तरी सह्याद्रीत फिरणारा मी आता तिन ते चार महिने तरी सह्याद्रि च्या वाटेवर नजर लावून बसलेला असतो.त्यातच सर्व जण पुढच्या ट्रेक ची वाट पहातच होते.पण सध्याची परिस्थिती पाहता आपण बघतोय काही प्राचिलीत किल्ल्यावर जत्रे सारखी झुंबड पडत आहे .म्हणूनच अशा निर्जन किल्यावर भेट द्यायचा विचार करत असताना पाच वर्षांपूर्वी केलेला भैरवगड डोक्यात आला.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याला खरं तर निसर्गाचं वरदान आणि सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांचं कोंदण लाभलंय. भंडारदराच्या धरणाच्या अवतीभोवती नांदणारे गड-किल्ले म्हणजे सह्याद्रीच्या भक्तांचे जीव की प्राणच! या तालुक्यात कोणत्याही ऋतूत आणि कोणत्याही दिवशी या, इथला निसर्ग तुम्हाला वेड लावल्याशिवाय राहणार नाही. इथल्या शिरपुंजे गावात असंच एक गडरत्न उभं आहे. हे रत्न संपूर्ण पंचक्रोशीतल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं क्षेत्र भैरवगड म्हणूनही ओळखलं जातं. भैरवगड शिरपुंजे चा हा किल्ला म्हणजे भटक्यांची पांढरी असलेल्या हरीशचंद्रगड, पण सध्याची तेथील गर्दी ची परिस्थिती पाहता त्याच्याच प्रभावळीत असलेल्या कुंजरगड (कोंबडगड) , भैरवगड (कोथळे) , कलाडगड , भैरवगड (शिरपुंजे) या किल्ल्यांवर फ़ारच कमी दुर्ग भटके जातात. हरीशचंद्रगडकडे जाणार्‍या विविध मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी प्राचीनकाळी हे किल्ले बांधलेले असावेत.

महाराष्ट्रातील ६ भैरवगडांपैकी २ भैरवगड हे हरिश्चंद्रगड पर्वतरांगेत आहेत. कोथळ्याचा भैरवगड आणि शिरपुंज्याचा भैरवगड.

भैरवनाथ/भैरोबा हे स्थानिक लोकांचे दैवत आहे येथे अश्विन महिन्यात यात्रा भरते. शिरपुंजे गावातून ५०० मीटर उंचीवर भैरववगडाचे मंदिर आहे आणि पुर्ण वाट खडी चढण आहे. वाटेवर अनेक ठिकाणी कातळकोरीव पायर्‍या आहेत. या पाय वाटेने एक ते सव्वा तासात भैरवगड आणि घनचक्कर डोंगर यामधील खिंडीत येउन पोहोचतो. कातळात कोरलेल्या पायर्‍या चढुन आपण भैरवगड पठारावर येतो. गडावर मोठा पाणी साठा आहे. गडावर एकुण २३ टाके आहेत पण त्यातील २ ते ३ टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. पावसाळ्यात सर्व पाणी टाके भरलेले असतात. काही टाक्याच्या बाजुला रांजण खळगे कोरलेत. गडावर काही ठिकणी विरगळी पाहायला मिळतात. कातळात खोदलेल्या पायर्‍या उतरुन कड्याच्या टोकावर कोरलेल्या भैरोबाच्या जोड गुहेत जाता येते. गुहेत भैवनाथाची अश्वारुढ मुर्ती आहे. तेथेच बाजुला असलेल्या गुहेत स्वयंपाकाची भांडी आणि चुल आहे आणि येथे मुक्काम करू शकतो. गुहेच्या कड्याकडील बाजुहुन शिरपुंजे गाव, घनचक्कर डोंगररांग दिसते.

भैरवगड म्हणजे पावसाळ्यात तर हिरव्यागार शालूनी  आणि पांढऱ्या शुभ्र धबधब्यानी नटलेला असतो. असा हा ट्रेक करण्याची संकल्पना मी आमचे सोबती उमेश कडे मांडली अन तारीख ठरली बघता बघता चारच दिवसात आमची गाडी पण फुल झाली .पण पुन्हा तेच आमच्या वाटेला आलं ....करोना मूळ हरिश्चंद्रगड कळसुबाई अभयारण्य शनिवारी रविवारी बंद करण्यात आलं अन ट्रेक पुन्हा एकदा रद्द करावा लागला.पण सर्व जण उत्सुक असल्यामुळे त्यांचा  हिरमोड हाऊ नये म्हणून सर्वांच्या सोयीने शुक्रवार 16 तारीख आम्ही जाहीर करून तयारी चालू केली.आणि तो दिवस उजेडला सकाळी 4.30वाजता आम्ही प्रवासासाठी सुरुवात करून आम्ही आमचा सह्याद्रीतील विश्वासू आमचा पाचनई चा मित्र प्रकाश कडे चहा नाश्ता साठी थांबलो त्याला सोबत घेऊन आम्ही भैरवगड कडे निघालो परंतू बऱ्याच वेळेस पावसाळी ट्रेक मध्ये येणारे अनुभव नेमका आज आमच्या वाटेला आला.ते म्हणजे अंबित गावाजवळ एक झाड पडलेलं आहे अशी कल्पना एका वाटसरू ने दिली म्हणून प्रकाश ने दुसऱ्या मार्गाने जाण्याचा पर्याय सांगितला त्या प्रमाणे आम्ही खडके मार्गे जाण्यास निघालो तो रस्ता मला देखील अपिरिचित च होता.पण प्रकाश ला तो माहीत होता पण तो एवढा दूर असेल वाटलं नाही .बराच वेळ प्रवास करून देखील पोहोचण्याचे काहीच चिन्ह दिसत नसताना ट्रेक मधील जवळ पास सर्वच मंडळी पहिल्यांदाच पावसाळी ट्रेक करत असल्या मूळ मनातून चिडचिड करू लागले ते देखील स्वाभाविकच आहे म्हणा पण आम्हाला ह्या पावसाळ्यात होणाऱ्या झाड पडणे,रस्ता खचने,पूल बंद असणे असे अनुभव असल्याने एकदा का पायथ्यापाशी पोहचलो ना मग सगळ्यांची चिडचीड कमी होईल याची अशा होती आणि झाले देखील तसेच पायथ्याला पोहचल्यावर निसर्गाने हलक्याश्या सरी  आमच्या अंगावर पाडून क्षणार्धात आमचा थकवा दूर होत गेला.गड सर करताना नेहमी प्रमाणे प्रकाश पुढे अन सर्वात मागे मी थांबून  कातळ्यातील काही पायऱ्या चढून आम्ही घनचक्कर आणि भैरवगड च्या खिंडीत पोहचलो अन तिथून पुढे तर अलगत अशी ढगांची चादर आमच्या अंगावर आली असा हा अनुभव बऱ्याच जणांनी पहिल्यांदाच अनुभवला असल्याने आपण ढगात असल्याचा फील त्यांच्या चेहऱ्यावर येत होता.शेवटचा टप्पा पार करून आम्ही गडावर पोहचलो.गडावरील सौंदर्य पाहून तर सर्वच निसर्गाच्या प्रेमात पडले त्यात ग्रुप मध्ये महिला असल्याने त्यांचा आवडता विषय म्हणजे फोटोग्राफी चा सर्वांनी मनमुराद फोटोसेशन करून अन भैरवनाथाचे दर्शन करून गड उतार करण्यास सुरुवात केली.खाली पोहचल्यावर जे पहिल्यांदाच असे निसर्गाच्या सानिध्यात आले होते त्यांच्या चेहऱ्यावरील भाव खूप काही सांगून जात होते.अन सर्वांनी ग्रुप फोटो घेऊन परतीचा प्रवास सुरु केला रस्त्यात अंबित धरणावर राहिलेल्या फोटोसेशन चा आनंद घेऊन आम्ही प्रकाश च्या घरी जेवणासाठी पोहचलो.प्रकाश ने पण सुंदर आशा पिठलं, भाकरी ,मटकी बटाट्याच्या स्वयंपाक करून सर्वांना खुश केलं.अन आम्ही सह्याद्रि च्या सुंदर आठवणींची शिदोरी घेऊन परतीचा प्रवास चालू केला.

ग्रुप मध्ये बरीच मंडळी नवखी असल्याने त्यांनी आमच्या वर जो विश्वास टाकून ट्रेक ला आले त्यांचे खरोखरच मनापासून धन्यवाद आणि तो विश्वास आम्ही आमच्या परीने पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला तरी ट्रेक मध्ये जर काही त्रुटी आढळल्यास क्षमस्व.

सर्वात शेवटी माझं नेहमीच सांगणं असत ...

महाराष्ट्र च्या भूमीत जन्माला यावे आणि किल्ले शिखर पाहू नये, हे होवूच शकत नाही. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात दोन ते तीन महिन्यातून एकदातरी किमान  वेळ काढून किल्ल्यावर जावून एका आगळ्यावेगळ्या नंदनवनात जावून येण्याचा अविस्मरणीय अनुभव घ्यावाच, नाहीतर आयुष्य व्यर्थच गेले असे समजा!! 🙏🏻🚩


सचिन भांड

sahyadritrekers.blogspot.com

Wednesday, February 24, 2021

सांधण दरी ट्रेक







सांधण vally full decend trek

Date- २०/२१ फेब.२०२१


काही वर्षांपूर्वी एअर टेल च्या जाहिरातीने प्रकाश झोत्यात आलेली ही दरी ती जाहिरात पाहूनच खर तर तिच्या ऱ्हष्याच्या प्रेमात मी पडलेलो होतो आणि ती बघायची इच्छा लगेचच पूर्ण पण झाली त्या वेलेस ही पूर्ण दरी एकाच दिवसात आम्ही करोली घाट रात्रीच्या अंधारात चढून पूर्ण केली होती. अशी ही दरी करायची इच्छा आमच्या सह्याद्री च्या मित्रांनी माझ्या कडे केली आणि दोन दिवसाच नियोजन करून पूर्ण ट्रेक चा प्लॅन केला 

सांधण दरी विषयी सांगायचं झाल्यास निसर्गाच्या कुशीत दडलेलं हे आश्चर्य आजही कित्येकांना माहित नाही. अहमदनगर जिलह्यातल्या सामरद या गावातून पुढे दीड ते दोन किमी अंतराने जाणारी ही दरी ट्रेकर्ससह इतर भटक्यांनाही मोहात पाडते. पावसाळ्याचे चार महिने वगळता वर्षभर पर्यटक इथे गर्दी करतात. सांधण दरी पूर्ण पहावयाचे झाल्यास दारीतील निमुळत्या खडकाळ वाटेवरून पुढे जात रात्री तिथेच मुक्काम करायचा हाच इथे आलेल्या अनेकांचा प्लॅन असतो. समोर आजोबा पर्वत, रतन गड आणि मागे अलंग-मदन-कुलंग गड आणि कळसुबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असताना ही सांधण दरी सर करणं तुम्हाला त्या मानाने सोपं जरी वाटत असलं तरी ते खरं तर दरीत पूर्ण उतरल्यावळच कळत. आशिया खंडातील क्रमांक दोनची खोल दरी असा या दरीचा लौकीक असल्याचं सांगितलं जातं. म्हणूनच ती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात. सांधण दरीला यायचं तर निदान दोन दिवस तरी काढायला हवेत. ही दरी पूर्ण पहावयाचे झाल्यास साहसी मोहीमा करतच पुढे जायचं असंच  त्या साठी तुम्हाला rappling करतच या दरीमध्ये उतरून. पुढे जागोजागी रॅपलिंग, क्लाइंबिंग असे साहसी प्रकार करत तुम्ही पुढे सरकता. अर्थात, हे सगळे साहसी प्रकार तज्‍ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करायला हवेत.आणि रात्री दरीच्या शेवटच्या टोकापाशी रात्रीच्या लक्ख अंधारात जंगलाच्या सानिध्यात तंबू ठोकून दुसऱ्या दिवशी सकाळीच करोली घाट चढून परतीच्या प्रवासाला लागायचं अन गावात दुपारचं जेवण केलं की या दरीतल्या आठवणी घेऊन पुन्हा आपल्या घरी जायचं.

असा ह्या ट्रेक च नियोजन मी आणि माझे ट्रेकर मित्र उमेश,सुशांत, laxuman याना सोबत घेऊन नियोजन केल्यावर सुरवातीला 17 लोकांचं प्लॅन करता 26 लोकांचं झाल सुरवातीला ट्रेक विषयी पूर्ण कल्पना ग्रुप वर दिलीच होती सर्व जण आता अतुरतरने तो दिवस उजेडण्याची वाट पाहत होते आणि तो दिवस उजेडला सकाळी 4 वाजता आमची गाडी श्रीरामपूर वरून प्रस्थान करत वाटेत आमचे कोल्हार चे आणि देवळाली चे मित्र घेऊन आमचा प्रवस चालू झाला त्यातच रस्त्यात आमची गाडीचे tyre puncture झाले त्यात एक दीड तास गेला पण तेवढ्या वेळात आम्ही ह्या ट्रेक ला बरीचशी नवखी मंडळी असल्याने सर्वांची ओळख करून घेतली  आमचा गाडीचा ड्राइवर फारच स्लो असल्याने आपल्याला आता निश्चितच ठरवलेल्या वेळेच्या पेक्षा आता उशीर होणार याची एव्हाना कल्पना मला आलीच होती असा हा प्रवास करत आम्ही साम्रद मधील माझा मित्र आनंदाच्या घरी 11 वाजता पोहचलो आणि थोडीही वेळ न दवडता नाश्ता आणि सोबत दुपारच्या जेवणासाठी भाजी भाकरी सोबत घेऊन लागलीच ट्रेक ला सुरवात केली सुरवातीलाच प्रचंड उत्साह असल्याने सर्व मंडळी फोटो काढत प्रवास करत होते सुरवातीच्या patch च्या ठिकाणी छाती एवढ्या पाण्याच्या डबक्यात आता ग्रील टाकल्याने ती वाट आता सोईस्कर झाली खरी पण पाण्यातून जाण्याचा थरार मात्र निघून गेला.अश्या ह्या खडकातून वाट काढत आम्ही पहिल्या rappling patch पाशी आलो यातील बरेच शी मंडळी पहिल्यांदाच rappling करताय ते पाहून अस किंचितसही वाटलं नाही सर्वांनीच सुरेख हा टप्पा पार केला खरा पण पुढे दिसणार प्रचंड खडकाळ वाट आपली शरीर क्षमता याचा आता कस लागणार याची एव्हाना सर्वानाच कल्पना आली होती पण आता आपण अश्या ठिकाणी आहोत तेथून मागे फिरणं तर दूरच होत त्या मूळ आहे त्या परिस्थितीत आता पुढे जावेच लागणार होते असे हे कठीण patch पूर्ण करत आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो आणि सर्वांनी आपापल्या तंबूत मुक्काम ठोकला थोडीशी विश्रांती  जेवण करून जे ते दिवसभर पायपीट झाल्यामुळं झोपी गेले.

सकाळी सर्वांना लवकरच जाग आली पण सर्वांच्या आता मांड्या पाय जॅम झाल्या होत्या सर्वांच्या मनात एकाच शंका हाती आपलं आता हा डोंगर चढण होईल का नाही पण समोर कुठलाच पर्याय नव्हता   सर्वांनी  चहा आणि पोह्याचा नाश्ता करून लागलीच करोली घाटाचा डोंगर चढवयास सुरवात केली आमची बरीचशी मंडळी सप सप थोडं थांबत थोडं चालत डोंगर सर करत होती त्यातच आमचा एक  मित्र थोडा थकल्याने त्याला सोबत घेऊनच आणि त्याचा कानोसा घेऊनच मी पण चालत होतो पण एका ठिकाणी त्याला आवाज दिला तरी त्याच्या कडून काहीच प्रतिसाद येत नव्हता म्हणून मी परत माघारी फिरलो तर महाशय मस्त कानात हेड फोन लावून गाणे ऐकत होते त्या नंतर त्याला पुढे घालूनच आम्ही आनंदाच्या घरी सर्वात शेवटी  पोहोचलो तो पर्यंत बाकीचे मंडळी धरणाच्या पाण्यात डुबकी मारून जेवणास पण बसली होती.मंग आम्ही पण धरणात अंघोळ करून सुंदर पिठलं भाजी भाकरी वर ताव मारला .ह्या ट्रेक दरम्यान मनातून काहींनी मला शिव्या पण दिल्या असतील कुठं आणलं ह्या माणसानं पण जेव्हा ट्रेक पूर्ण झाला तेव्हा आता सर्वांच्या चेहऱ्यावर आता एक आत्मिक समाधान होत जे आयुष्यात आपण कधी विचारही केला नसता ते पूर्ण झाल्याचा.तसेच ह्या ट्रेक च वैशिष्ट्य म्हणजे बरीचशी मंडळी ही चाळीशी पार झालेली आणि विशेष कौतुक आमच्या कोहली काकांचा वयाच्या 70 रीत देखील तरुणांना लाजवेल असा हा ट्रेक त्यांनी सुंदर रित्या पूर्ण केला.

सर्व मंडळी ज्या विश्वासाने तुम्ही आमच्या सोबत आलात आणि आम्ही आमच्या परीने तो विश्वास  पूर्ण कसरण्याचा प्रयत्न केला.तरी आमच्या कडून काही त्रुटी राहिल्या असतील तर नक्कीच पुढील ट्रेक ला त्या दुरुस्त होतील सर्वांचे पुनःश्च खूप खूप धन्यवाद

सचिन भांड

सह्याद्री ट्रेकर्स श्रीरामपूर

sahyadritrekers.blogspot.com





Tuesday, January 12, 2021

हरिश्चंद्रगड महिला विशेष ट्रेक


हरिश्चंद्रगड महिला विशेष  ट्रेक..

१० जानेवारी २०२१.

सध्या च्या युगात  पुरुषांच्या बरोबरीने सर्व जबाबदाऱ्या आत्मविश्वासाने हाताळणाऱ्या, दैनंदिन आयुष्यातील पेच प्रसंगांना थेट सामोऱ्या जाणाऱ्या आणि आता सामाजिक पातळ्यांवर लादण्यात येणारी बंधने धैर्याने बाजूला सारून श्रीरामपुर सारख्या ग्रामीण भागातील ही श्री 'शक्ती'  १०जानेवारी.म्हणजेच दोनच दिवसा नंतर येणाऱ्या राजमाता जिजाऊ मासहेबांच्या जन्मदिनी.अश्या ह्या जिजाऊ च्या लेकी एकवटल्या त्या कोणत्याही परिस्थितीत सामोरे जाण्यास, त्याच्या विरोधात लढण्यास आम्ही सक्षम आहोत, मोकळेपणाने श्वास घ्या. अभिमानाने जगण्याची सुरुवात करा. आपनच आपल आरोग्याचा कसा सांभाळ करायचा असा हा संदेश  देऊन या महिलांनी ट्रेक चा बिनधास्त मनमोकळेपणाने आनंद घेतला.

सह्याद्रीतील भटक्यांची पंढरी, सह्याद्रीचा मुकुट मनी अशी ना ना प्रकारची विशेषणे जर कोणासाठी वापरली जात असतील तर आम्हा भटक्यांच्या तोंडी एकाच नाव येतं ते म्हणजे हरिशचंद्रगड.
    हरिश्चंद्र गडाला भटक्यांची पंढरी का म्हणतात हे खर तर आपण तिथे भेट दिल्यावर कळत कारण प्रत्येक वेळी वेग वेगल दिसणार तीच सौदर्य पावसाळ्यात तर ते अजुन फुलून दिसत पृथ्वी वरील स्वर्ग जर  पहायचं असेल तर एकदा तरी पावसाळ्यात प्रत्येकाने भेट दिलीच पाहिजे आणि ह्या पंढरीचा मी एक वारकरी दर वर्षी निदान दोन तीनदा तरी  न चुकता भेट देणारा.गडाचा ,इथल्या मातीचा आणि सर्वात महत्वाचं इथल्या माणसाचा माझा  जिव्हाळ्याचा संबंध अगदी की माझं सह्याद्री तील दुसर घरच. अश्या खूप साऱ्या आठवणी ह्या मातीत जडल्या आहेत.कारण सह्यद्रीतील अवघड ट्रेकच्या प्रवासाला माझी ह्याच गडापासून सुरवात झाली ती पण रोप लावून गडावर जाणाऱ्या कोकणकड्याच्या बाजूच्या  नळीच्या वाटेने अन परत पाचनई गावात उतरून सादाडे घाटातून खाली उतरलो असा हा तब्बल अठरा तासाचा ट्रेक मी माझ्या जुन्या ग्रुप बरोबर एकाच दिवसात केला होता

     तश्या गडावर जाण्यासाठी खीरेश्र्वर,नळीची वाट, सदडे घाट,माकड नाळ आणि सर्व आबालवृद्धांना घेऊन जाणारी तितकीशी सोईस्कर अशी पाचणाई मार्गे तसे पाच्नाई  गावाला हे जे नाव पडलं ते इथे उगम पावणाऱ्या पाच उप नद्या मुळे.ह्या गावातून फक्त दोनच तासात आपण गडावर पोहचतो हरिश्चंद्रगड हा ठाणे ,पुणे,नगर, च्या सीमेवर आणि माळशेज घाटाच्या डावीकडे असणारा अजस्त्र असा डोंगर ह्या गडाला तसा महाराजांच्या लढाईचा जास्त इतिहास नसला तरी गडाला 2/3 हजार वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी आहे आदिवासी कोळी महादेव समाजाच्या ताब्यात असणारा हा गड मोगलांनी ताब्यात घेतला पुढे तो मराठ्यांनी 1747-48 मध्ये मुगलांकडून ताब्यात घेतला.तसेच ह्या गडावर हरिश्चंद्र रोहिदास तारामती अशी शिखरे असल्या मुळे त्याचा संदर्भ थेट राजा हरिशचंद्र यांच्याशी देखील जोडला आहे जेव्हा राजाने कुबेरा कडून कर्ज घेतले होते ते फेडता न आल्याने राजा इथे वास्तव्यात होते असे गावकरी सांगतात त्याच प्रमाणे ह्या गडावरील मंदिराच्या मागील गुहेत चांगदेव महाराजांनी 1400 वर्ष तपश्चर्या केली आहे अस देखील सांगतात.
     गडावर सुमारे 12 व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील हरिहरेश्वर च  शिवमंदिर  आहे तसेच प्राचीन लेणी आणि मंदिरा समोर  सुंदर अशी पुष्करणी देखील आहे.तसेच गुहेतील केदारेश्वर च मंदिर तर अदभुत च आहे अस म्हणतात की सत्य युगात धर्म चार पायांवर उभा असतो त्रेता युगात 3 पायावर द्वार युगात 2 पायावर आणि कली युगात सध्या एका पायावर असे हे शिवलिंग पाहिल्यावर आपल्याला हे लक्षात येतं मूळचे चार खंबनी वेढलेल आज एकाच खांबावर उभेआहे.
मंदिराच्या मागील बाजूने एक वाट अजाष्र अशा  कोकण कड्याकडे जाते कोकण कड्याच वर्णन शब्दात व्यक्त न करण्यासारखे आहे.पूर्वी अतिशय सुंदर देखण कोकण कडयाच रूप  आता लोखंडी तटबंदीने वेढल आहे.प्रत्येक ऋतु मध्ये वेग वेगळं दिसणार कोकणकड्या  च हे रूप तुमचं  नशिब जर चांगले असले तर तुम्हाला ढगांच्या गर्दीत स्वर्गात असल्याचा भास नक्कीच होतो. 

   असा हा सुंदर गड करण्याचं R S Fitness च्या संचालिका सुरोडकर मॅडम यांचा डिसेंबर मध्ये फोन आला आम्हा महिलांना हरिश्चंद्र गड ट्रेक करायची खूप इच्छा आहे त्या साठी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावे.परंतु डिसेंबर मध्ये माझे काही ट्रेक असल्या मुळे  क्षणाचा पण विलंब न करता आपल्या सारख्या ग्रामीण भागातून ट्रेक करण्याची महिलांची इच्छा तयार होत आहे हे जाणून खूप आनंद झाला आणि त्या ऐतिहासिक क्षणाचे आपण एक त्यांना सह्याद्री पर्यंत पोहचण्याचे  माध्यम बनत आहोत म्हणून लगेच  जानेवारी ची तारीख दिली. त्या नुसार गडावरील सर्व व्यवस्था करण्यास आमचा सह्याद्रीतील सोबती प्रकाश ला सांगितले.जस जशी ट्रेक ची तारीख  जवळ येत होती तास तसे महिलांचा उत्साह किती वाढत होता ते मॅडम चे जेव्हा जेव्हा फोन येत होते त्या वरून कळत होते.त्यातच अगदी तारीख जवळ आल्या मुळ ऐन थंडी मध्ये पावसाळी ढग निर्माण झाल्यामुळं निसर्गानं हे एक वेगळंच वळण घेतलं त्या मुळ कुठ तरी आपली ही इच्छा पुढं सरकती का काय असे देखील महिलांच्या मनात येत असेल पण आम्हा भटक्यांना हवा हवासा वाटणारा च तो बदल होता हे त्या जेव्हा गडाच्या मध्यावर आले आणि पहाटेची  ती हलकी चादर बाजूला झाली तेव्हा अनुभवला च असेल. 
अश्या प्रकारे ज्या दिवसाची ह्या सर्व वाट पाहत होता तो दिवस अखेर उजेड ला रात्री ठीक १२ वाजता गाडी आली आणि आमचा प्रवास चालू झाला तो गडाच्या पायथ्या ला असणाऱ्या पाच्णाईं गावाकडे सकाळी आम्ही गावात ५ वाजता पोहचल्यावर फ्रेश होऊन चहा  घेऊन लगेच पहाटेच्या अंधारात ट्रेक चालू केला सोबत माझा छोटा ट्रेकर म्हणजे माझा मुलगा सोबत होताच तो देखील १/२ वेळेस गडावर आल्या मुळे त्याला रस्ता चांगलाच माहितीच होता म्हणून त्यालाच मी सर्वात पुढे राहण्यास सांगितले आणि मी मागे कारण सर्वात शेवटच्या माणसाला सुखरूप गडावर नेने आणि गडावरून खाली आणणे हे शेवटच्या माणसाचे काम असते त्या नुसार ८.३० पर्यंत आम्ही गडावर पोहच तो न पोहाच तो तेच महिलांचा आवडता विषय म्हणजे फोटोग्राफी चा मनमुराद आनंद त्यानी लुटला आणि त्या फोटोग्राफी साठी सोबतीला अधून मधून हेलकावे खाणाऱ्या दाट धुक्याची चादर होतीच.तेथून लगेचच आम्ही प्रकाश कडे गेलो.आणि आमच्या अनिता ताई ने लगेचच सुंदर असे पोहे  चहा नाष्टा खाऊन आम्ही कोकण कड्या कडे गेलो कोकण काड्याचं सुंदर देखन रूप पाहून तर योगा रोमा रोमात भिनलेले असल्या मुळे योगासनाचे प्रात्यक्षिके करण्याचा मोह आमच्या सर्व ताई ना राहवलं नाही.आणि ते फोटो घेण्याचा मोह मला.असा हा पुरेपूर आनंद घेऊन आम्ही परत प्रकाश कडे आलो आणि स्वयंपाक तयार होऊ पर्यंत आम्ही हरिहरेश्वर च दर्शन घेतले तिथे काही दिवसापूर्वी विठ्ठल रखुमाई मूर्तीची चोरी झाल्यामळें नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती त्या मुळ आपण देखील ह्या क्षणाचे साक्षीदार झालोत याचा देखील एक वेगळा आनंद झाला.तिथून आम्ही केदारेश्वर च अदभुत अस मंदिर पाहून पुष्करणी पासी आल्यावर सोशल मीडिया वर असणाऱ्या पुष्करणी मधील देवळी च्या ठिकाणच्या ज्या poses असतात त्या प्रमाणे  फोटो काढण्याचा प्रयत्न केला.त्या नंतर लगेचच आम्ही सर्वांनी अनिता ताईच्या हतचा गरमागरम कांदा बटाटा भाजी,ठेचा भाकरी चा मनमुराद आनंद घेऊन गड उतारास सूरवत केली .सायंकाळी ४.३० वाजे पर्यंत आम्ही सर्व पायथ्याला सुखरूप पोहचलो आणि आमचा परतीचा प्रवास चालू झाला तो सोबत असा सुंदर आठवणीची शिदोरी घेऊन.
 असा हा सुंदर आणि अविस्मरणीय ट्रेक  सर्व ह्या अनोळखी महिलांनी माझ्या वर जो विश्वास दाखवून आणि त्यांचा हा विश्वास माझ्या परीने सह्याद्री ची ओळख करून देण्यास मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला तरी देखील काही कमी जास्त चुकले   असतील तर क्षमस्व.
सह्याद्रीत कधी ही फिरायची इच्छा झाल्यास ह्या तुमच्या भावाला  हाक मारा तो तयार असेल.


सर्वात शेवटी मझ एकाच सांगणं अस्त...

महाराष्ट्र च्या भूमीत जन्माला यावे आणि किल्ले शिखर पाहू नये, हे होवूच शकत नाही. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात वर्षातून एकदातरी किमान दोन दिवसांचा वेळ काढून किल्ल्यावर जावून एका आगळ्यावेगळ्या नंदनवनात जावून येण्याचा अविस्मरणीय अनुभव घ्यावाच, नाहीतर आयुष्य व्यर्थच गेले असे समजा!!

सचिन भांड
sahyadritrekers.blogspot.com

देवभूमी यात्रा

  ​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ​‘मनात भक्ती...