भैरवगड ट्रेक🚩
भैरवगड (शिरपुंजे), अकोले, नगर जिल्हा.
गडाचा प्रकार- गिरीदुर्ग
डोंगररांग- घनचक्कर
गडाची उंची- ३७९२ फूट
श्रेणी- मध्यम
आजमितीस कोरोना या महामारी सदराखाली आपण सर्वजण एका विशिष्ट प्रकारच्या महाभयंकर गुलामीच्या आणि मरणासन्न परिस्थितीकडे वाटचाल करीत आहोत. त्यात आमच्या सारखे भटके देखील होरपळून निघत आहोत महिन्यातून एक दोनदा तरी सह्याद्रीत फिरणारा मी आता तिन ते चार महिने तरी सह्याद्रि च्या वाटेवर नजर लावून बसलेला असतो.त्यातच सर्व जण पुढच्या ट्रेक ची वाट पहातच होते.पण सध्याची परिस्थिती पाहता आपण बघतोय काही प्राचिलीत किल्ल्यावर जत्रे सारखी झुंबड पडत आहे .म्हणूनच अशा निर्जन किल्यावर भेट द्यायचा विचार करत असताना पाच वर्षांपूर्वी केलेला भैरवगड डोक्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याला खरं तर निसर्गाचं वरदान आणि सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांचं कोंदण लाभलंय. भंडारदराच्या धरणाच्या अवतीभोवती नांदणारे गड-किल्ले म्हणजे सह्याद्रीच्या भक्तांचे जीव की प्राणच! या तालुक्यात कोणत्याही ऋतूत आणि कोणत्याही दिवशी या, इथला निसर्ग तुम्हाला वेड लावल्याशिवाय राहणार नाही. इथल्या शिरपुंजे गावात असंच एक गडरत्न उभं आहे. हे रत्न संपूर्ण पंचक्रोशीतल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं क्षेत्र भैरवगड म्हणूनही ओळखलं जातं. भैरवगड शिरपुंजे चा हा किल्ला म्हणजे भटक्यांची पांढरी असलेल्या हरीशचंद्रगड, पण सध्याची तेथील गर्दी ची परिस्थिती पाहता त्याच्याच प्रभावळीत असलेल्या कुंजरगड (कोंबडगड) , भैरवगड (कोथळे) , कलाडगड , भैरवगड (शिरपुंजे) या किल्ल्यांवर फ़ारच कमी दुर्ग भटके जातात. हरीशचंद्रगडकडे जाणार्या विविध मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी प्राचीनकाळी हे किल्ले बांधलेले असावेत.
महाराष्ट्रातील ६ भैरवगडांपैकी २ भैरवगड हे हरिश्चंद्रगड पर्वतरांगेत आहेत. कोथळ्याचा भैरवगड आणि शिरपुंज्याचा भैरवगड.
भैरवनाथ/भैरोबा हे स्थानिक लोकांचे दैवत आहे येथे अश्विन महिन्यात यात्रा भरते. शिरपुंजे गावातून ५०० मीटर उंचीवर भैरववगडाचे मंदिर आहे आणि पुर्ण वाट खडी चढण आहे. वाटेवर अनेक ठिकाणी कातळकोरीव पायर्या आहेत. या पाय वाटेने एक ते सव्वा तासात भैरवगड आणि घनचक्कर डोंगर यामधील खिंडीत येउन पोहोचतो. कातळात कोरलेल्या पायर्या चढुन आपण भैरवगड पठारावर येतो. गडावर मोठा पाणी साठा आहे. गडावर एकुण २३ टाके आहेत पण त्यातील २ ते ३ टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. पावसाळ्यात सर्व पाणी टाके भरलेले असतात. काही टाक्याच्या बाजुला रांजण खळगे कोरलेत. गडावर काही ठिकणी विरगळी पाहायला मिळतात. कातळात खोदलेल्या पायर्या उतरुन कड्याच्या टोकावर कोरलेल्या भैरोबाच्या जोड गुहेत जाता येते. गुहेत भैवनाथाची अश्वारुढ मुर्ती आहे. तेथेच बाजुला असलेल्या गुहेत स्वयंपाकाची भांडी आणि चुल आहे आणि येथे मुक्काम करू शकतो. गुहेच्या कड्याकडील बाजुहुन शिरपुंजे गाव, घनचक्कर डोंगररांग दिसते.
भैरवगड म्हणजे पावसाळ्यात तर हिरव्यागार शालूनी आणि पांढऱ्या शुभ्र धबधब्यानी नटलेला असतो. असा हा ट्रेक करण्याची संकल्पना मी आमचे सोबती उमेश कडे मांडली अन तारीख ठरली बघता बघता चारच दिवसात आमची गाडी पण फुल झाली .पण पुन्हा तेच आमच्या वाटेला आलं ....करोना मूळ हरिश्चंद्रगड कळसुबाई अभयारण्य शनिवारी रविवारी बंद करण्यात आलं अन ट्रेक पुन्हा एकदा रद्द करावा लागला.पण सर्व जण उत्सुक असल्यामुळे त्यांचा हिरमोड हाऊ नये म्हणून सर्वांच्या सोयीने शुक्रवार 16 तारीख आम्ही जाहीर करून तयारी चालू केली.आणि तो दिवस उजेडला सकाळी 4.30वाजता आम्ही प्रवासासाठी सुरुवात करून आम्ही आमचा सह्याद्रीतील विश्वासू आमचा पाचनई चा मित्र प्रकाश कडे चहा नाश्ता साठी थांबलो त्याला सोबत घेऊन आम्ही भैरवगड कडे निघालो परंतू बऱ्याच वेळेस पावसाळी ट्रेक मध्ये येणारे अनुभव नेमका आज आमच्या वाटेला आला.ते म्हणजे अंबित गावाजवळ एक झाड पडलेलं आहे अशी कल्पना एका वाटसरू ने दिली म्हणून प्रकाश ने दुसऱ्या मार्गाने जाण्याचा पर्याय सांगितला त्या प्रमाणे आम्ही खडके मार्गे जाण्यास निघालो तो रस्ता मला देखील अपिरिचित च होता.पण प्रकाश ला तो माहीत होता पण तो एवढा दूर असेल वाटलं नाही .बराच वेळ प्रवास करून देखील पोहोचण्याचे काहीच चिन्ह दिसत नसताना ट्रेक मधील जवळ पास सर्वच मंडळी पहिल्यांदाच पावसाळी ट्रेक करत असल्या मूळ मनातून चिडचिड करू लागले ते देखील स्वाभाविकच आहे म्हणा पण आम्हाला ह्या पावसाळ्यात होणाऱ्या झाड पडणे,रस्ता खचने,पूल बंद असणे असे अनुभव असल्याने एकदा का पायथ्यापाशी पोहचलो ना मग सगळ्यांची चिडचीड कमी होईल याची अशा होती आणि झाले देखील तसेच पायथ्याला पोहचल्यावर निसर्गाने हलक्याश्या सरी आमच्या अंगावर पाडून क्षणार्धात आमचा थकवा दूर होत गेला.गड सर करताना नेहमी प्रमाणे प्रकाश पुढे अन सर्वात मागे मी थांबून कातळ्यातील काही पायऱ्या चढून आम्ही घनचक्कर आणि भैरवगड च्या खिंडीत पोहचलो अन तिथून पुढे तर अलगत अशी ढगांची चादर आमच्या अंगावर आली असा हा अनुभव बऱ्याच जणांनी पहिल्यांदाच अनुभवला असल्याने आपण ढगात असल्याचा फील त्यांच्या चेहऱ्यावर येत होता.शेवटचा टप्पा पार करून आम्ही गडावर पोहचलो.गडावरील सौंदर्य पाहून तर सर्वच निसर्गाच्या प्रेमात पडले त्यात ग्रुप मध्ये महिला असल्याने त्यांचा आवडता विषय म्हणजे फोटोग्राफी चा सर्वांनी मनमुराद फोटोसेशन करून अन भैरवनाथाचे दर्शन करून गड उतार करण्यास सुरुवात केली.खाली पोहचल्यावर जे पहिल्यांदाच असे निसर्गाच्या सानिध्यात आले होते त्यांच्या चेहऱ्यावरील भाव खूप काही सांगून जात होते.अन सर्वांनी ग्रुप फोटो घेऊन परतीचा प्रवास सुरु केला रस्त्यात अंबित धरणावर राहिलेल्या फोटोसेशन चा आनंद घेऊन आम्ही प्रकाश च्या घरी जेवणासाठी पोहचलो.प्रकाश ने पण सुंदर आशा पिठलं, भाकरी ,मटकी बटाट्याच्या स्वयंपाक करून सर्वांना खुश केलं.अन आम्ही सह्याद्रि च्या सुंदर आठवणींची शिदोरी घेऊन परतीचा प्रवास चालू केला.
ग्रुप मध्ये बरीच मंडळी नवखी असल्याने त्यांनी आमच्या वर जो विश्वास टाकून ट्रेक ला आले त्यांचे खरोखरच मनापासून धन्यवाद आणि तो विश्वास आम्ही आमच्या परीने पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला तरी ट्रेक मध्ये जर काही त्रुटी आढळल्यास क्षमस्व.
सर्वात शेवटी माझं नेहमीच सांगणं असत ...
महाराष्ट्र च्या भूमीत जन्माला यावे आणि किल्ले शिखर पाहू नये, हे होवूच शकत नाही. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात दोन ते तीन महिन्यातून एकदातरी किमान वेळ काढून किल्ल्यावर जावून एका आगळ्यावेगळ्या नंदनवनात जावून येण्याचा अविस्मरणीय अनुभव घ्यावाच, नाहीतर आयुष्य व्यर्थच गेले असे समजा!! 🙏🏻🚩
सचिन भांड
sahyadritrekers.blogspot.com
No comments:
Post a Comment