Wednesday, July 27, 2022

अंधारबन एक स्वर्ग

 पावसात मस्त भिजायचे, हिरवेगार डोंगर पालथे घालायचे, धबधब्याखाली चिंब व्हायचे आणि भिजून झाल्यावर टपरीवर गरमागरम  भजी आणि चहा आहाहा....! 

असे अनेक अनुभव सर्वांनाच अनुभवायचे असतात. खर तर हे सगळ अनुभवण्यासाठी सगळे जण अगदी आसुसलेले असतात. आणि हे सगळे अनुभव पावसाळी ट्रेक शिवाय कसे येणार. अशा वेळी खरी धांदल उडते ती आम्हा ट्रेकर्सची गड किल्ले करु की धबधबे पाहू की जंगलात जाऊ, असे एक ना अनेक!


आजकाल आठवड्याच्या प्रत्येक रविवारी पावसाच्या ट्रेक आणि सहलीला जाण्याची क्रेझ आणि त्यात भर त्या सेल्फीकाठी घेऊन फोटो काढण्याची क्रेझ खूप जास्त वाढली असल्याने घाटाच्या प्रत्येक वळणावर माणसांची आणि वाहनांची धोकादायक तुफान गर्दी आढळते. जर असेच निसर्गाचा ऱ्हास करणारे लोंढे च्या लोंढे इकडे घाटमाथ्यावर वाहू लागले तर निसर्गाचा ऱ्हास लवकरच होईल याची भीती वाटते.

“निसर्गात फिरा परंतु तिथले नुकसान नका करू”  “संवर्धन करायला जमत नाही तर निदान संहार तरीकरु नका .”  हा एक नियम पाळला तरी आपणच आपली जैवविविधता सुरक्षित ठेवून आरोग्य सुरक्षित ठेऊ शकू.

सध्या दररोज च्या बातमीपत्रांमध्ये आपण वाचतो आहोतच की बरेच लोक दारू पिऊन सहलीला जातात तर जातात आणि गडकिल्ल्यांवरदेखील जातात कचरा करतात, असभ्य वर्तन करताना दिसतात, निसर्गाला  हानी पोहोचवतात शिवाय अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे इतरांच्या चुकीमुळे सगळेच ट्रेकर्स उगाचच बदनाम झाले आहेत.  मागील काही आठवड्यात  ताम्हिणी घाटामधील मधील देवकुंड धबधबा येथील  झालेल्या अपघातामुळे आणि भरपूर पावसाचे प्रमाण वाढल्या मुळे बऱ्याच गडकिल्ल्यावर आणि पर्यटनस्थळी जाण्यास बंदी आणली होती. पावसाचा जोर घाटामध्ये खूप जास्त असतो.त्या मुळे योग्य नियोजन आणि प्रसंगावधान जाणून घेतलेले निर्णय आणि योग्य मार्गदर्शनाखाली च पावसाळी ट्रेक केलेले योग्य.

असाच एक ट्रेक पावसाळ्यात एकदा तरी आवर्जून करावा तो म्हणजे ताम्हणी घाटातील पिंपरी गावातून सुरू होणार अंधारबन ट्रेक हा ट्रेक मागील वर्षीच करायचं नियोजन होत पण करोनाच्या विळख्या मुळे तो करता आला नाही.

तशी अंधारबन ची भुरळ मला जी पडली ती पंधरा वर्षांपूर्वी आम्ही माझे पुण्यातील काही घाटवाटा फिरणारी मित्रमंडळी कुंडलिका साठी निघालो तेव्हा गावात आल्यावर  अंधारबन विषयी कळल त्या वेळेस अंधारबन ट्रेक फारसा कोणाला माहितीही नव्हता आणि आज जी मळलेली वाट दिसते ती देखील फारशी दिसत नव्हती अशा ह्या गर्द काळोख्या जंगलात फक्त आम्ही आणि आम्हीच होतो असा हा कायम स्मरणात राहणारा ट्रेक कधीही विसरू शकत नाही.

आणि आता तोच ट्रेक परत एकदा करायचा म्हणून नियोजन चालू केले.आणि ट्रेक चा तो दिवस उजेडला.

शनिवारी रात्री 11 वाजता आम्ही अंधारबनकडे जाण्यासाठी ची वाट धरली आणि आमची सकाळ उजेडली ती ताम्हणी घाटाच्या विहंगम दृश्याने ती इतकी की लगेच शहाजी पाटलांच्या डायलॉग चा लागलीच आठवण झाली काय ती झाडे काय ते डोंगर असा सुरेल ताम्हणी घाटातील प्रवास करून आम्ही पिंपरी गावात पोहचलो



 तिथे पोहचल्यावर आमचा गाईड वाटच पहात होता त्याच्याकडे फ्रेश होऊन गरमागरम पोहे आणि चहा चा आस्वाद घेऊन आम्ही सर्वांशी ओळख करून आणि काही सूचना देऊन ट्रेक चालू केला सुरवातीला भात खाचरांची वाट तुडवत आम्ही अंधारबन ची वाट धरली आणि सामोर एक मनमोहक नजारा नजरेस पडला धुक्यात गुरफटलेले डोंगर आणि ओसंडून वाहणारा पाझर तलाव पुढील भटकंती ची उत्कंठा वाढवत होता. तलाव ओलांडून आम्ही पुढे गेलो आणि चालू झालं अंधारबन चं दाट जंगल! हे  जंगल ओलांडताना वाटेत अनेक धबधबे लागत होते. कित्येक फूट उंचीवरून कोसळणारे हे धबधबे, कड्याच्या टोकावरून पार करायचा अनुभव खूपच रोमांचकारी होता!



 हे सर्व धबधबे ओलांडत आजूबाजूची दृश्य कॅमेऱ्यात टिपत आम्ही पुढे निघालो. दोन सव्वा-दोन तास चालल्यावर जेव्हा आम्ही जंगलातून बाहेर पडलो तेव्हा एक मोठं हिरवंगार पठार लागलं, जणू हिरवळीचा गालिचाच अंथरल्या सारखं! हिरव्या रंगाच्या सुद्धा इतक्या विविध छटा असतात हे जंगलात फिरल्यावरच कळत . पठारावरून समोर एक नजर टाकली तेव्हा समोर कुंडलिका नदी आणि उंचावरून कोसळत तिच्या पात्रात येउन मिळणारे धबधबे असं विहंगम दृश्य दिसत होतं.अंधारबनातल्या असंख्य ओहोळांची बनते कुंडलिका नदी. या नदीवर भिरा गावाजवळ एक छोटेसे धरण बांधले आहे. त्याचाच जलाशय घाटमाथ्यावरून दिसत होता.


 डोंगरकड्यांवरून सर्व बाजूंनी धबधबे दरीत उतरत होते. आसपासची हिरवीगार वनश्री दरीतल्या बेभान वाऱ्यावर सळसळत होती. त्या दृश्याचा आस्वाद घेत आम्ही काही वेळ स्थिरावलो. दोन-चार फोटो काढून होतायत तेवढ्यात धुक्याचे लोट दरीत उतरू लागले. बघता बघता सारी दरी धुक्याने भरून गेली. दरीतला जलाशय तर दूरच राहिला, काही मीटर अंतरावरचा माणूस दिसणेही अवघड होऊ लागले. धुकं अजून दाट झालं तर पुढची वाट सापडणं मुश्कील होईल म्हणून आम्ही चालण्याचा वेग वाढवला. दरीच्या काठाने जाणारी वाट आता रानात शिरली. दाट झाडीतून वाट काढत आम्ही पुढे सरकू लागलो. तेवढ्यात एक खळाळता ओढा मार्गात आला. त्याच्या वरच्या अंगाला एक लहानसा धबधबा तयार झाला होता. गर्द हिरव्या झाडीत वाहणारा तो धबधबा पाहून भिजण्याचा मोह कुणाला आवरेल? आपसूकच सगळ्यांची पावलं तिथे वळली. भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटून आम्ही पुढे निघालो.




घनदाट अरण्यातून जाणारी पायवाट यापुढची वाट घनदाट अरण्यातून जात होती. वाटेत पाण्याचे लहानसहान ओहोळ आडवे येत होते. लाल मातीच्या लिबलिबीत चिखलातून पचक-पचक आवाज करत आम्ही पुढे चाललो होतो. आधीच ढगांनी अडवलेला सूर्यप्रकाश या अरण्यातल्या दाट पर्णसंभारापुढे हार मानून अंग चोरून बसला होता. गडद धुकं रानात ठिय्या देऊन बसलं होतं. एकंदरीतच सारे वातावरण एखाद्या भयपटात शोभेल असे वाटत होते. या अरण्याला अंधारबन का म्हणत असावेत याची पुरेपूर प्रचीती येथे येत होती त्या मुळेच  तिथे परतीच्या वाटेने येताना एक horrer क्लिप बनवायची माझ्या डोक्यात कल्पना अली आणि सोबत असलेल्या मित्रांच्या सोबत सुंदर अशी ती hoorer क्लिप बनून पूर्ण केली.

तिथून पुढे गेल्यावर बोकड्याचा नाला लागला तो पाहून लगेचच कल्पना आली अंधारबन मध्ये जे अपघात होतात ते याच ठिकाणी कारण पाण्याचा वाढता प्रवाह आणि खाली लगेच दरी  म्हणून लगेच पुढे जाऊन एक दोघांना सोबत घेऊन सर्वना तो नाला रोप चा आधार घेत पार करून घेतला आता या ठिकाणी एक अनुभव आला इथे गर्दी असल्याने काही दुसऱ्या ग्रुप मधील सदस्य खालच्या वाटेने तो ओढा कुठलीही सुरक्षितता न बाळगता क्रॉस करत होती तेव्हा त्यांच्या लीडर ला थोडे उपदेशाचे डोस पाजून त्या सर्वांना वरतून येण्यास सांगितले या असा बेफिकीर लोकांच्या मुळेच आज ट्रेकिंग क्षेत्र बदनाम होत आहे.

हळूहळू नाल्याचा प्रवाह वाढत असल्याचे पाहून आम्ही लगेचच तिथून आल्या त्या वाटेने परतीच्या प्रवासाला लागलो. 

आकाशात दाटलेले कृष्णमेघ आणि मागे उभा ठाकलेला सह्यकडा मोठ्या कौतुकाने आम्हा पामरांची ट्रेक संपविण्याची लगबग बघत होते. प्रत्येक ट्रेक मध्ये एक असा क्षण येतो की त्यात आपण भोवतालच्या निसर्गाशी एकरूप होऊन जातो. अंगात कितीही थकवा असला, निसर्गाने कितीही रौद्र रूप धारण केलेले असले, तरी ती रानावनातली रग्गड वाट संपूच नये असे वाटत राहते. आपल्या मनात उपजतच असलेली निसर्गाबद्दलची अनिवार ओढ कदाचित उफाळून वर येत असावी. ट्रेकिंग सारख्या तंगडतोड साहसी प्रकाराकडे खेचून नेणारी हीच ओढ असेल काय?

मार्गात आलेला ओढा संपू नये वाटणारी ती वाट अखेरीस पिंपरी गावात येऊन संपली. पावसानेही एव्हाना आपली खेळी आटोपती घेतली होतीच आता एव्हाना सगळ्यांच्या पोटातील कावळे हे ओरडायला लागलेच होते सगळ्यांनी सुरेख अशा जेवणाचा आस्वाद घेत हा अविस्मरणीय अनुभव डोळ्यात साचवत अंधारबन चा निरोप घेतला.


शेवटी आवर्जून सांगावेसे वाटते देवकुंड व अंधारबन परिसरात भटकंती करण्यापूर्वी किंबहुना पावसाळ्यातील सर्वच ट्रेक करताना अधिक सतर्क होणे गरजेचे आहे. शिवाय परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्व गिर्यारोहण संस्थांनीही सुरक्षिततेचे सगळे निकष आवश्यक सुरक्षित साधनांच्या साह्याने कटाक्षाने पाळायला हवेत, ज्या ठिकाणी धोका संभवतो अशा ठिकाणांपासून त्यांनी माघार घेऊन ग्रुपच्या सुरक्षिततेचा विचार प्रामुख्याने करायला हवा.. शिवाय इतर ठिकाणी भटकंती करताना ओढे-नाले ओलांडताना सुरक्षिततेची संपुर्ण खात्री करावी. परिस्थिती विपरीत असेल तर वेळीच माघार घ्यावी. निसर्गाचा आदर हाच करा भटकंतीचा खरा मूलमंत्र आहे.

सचिन भांड

सह्याद्रि ट्रेकर्स परिवार,श्रीरामपूर

No comments:

Post a Comment

देवभूमी यात्रा

  ​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ​‘मनात भक्ती...