Friday, November 29, 2019

Bhorgiri Bhimashankar Trek

सह्याद्री Trekers-:

12/13 oct.2019.

 भोरगिरी ते भीमाशंकर


पाऊस….. निसर्गाने दिलेलं एक सुंदर असं वरदान. पावसाळा सुरु झाला की सगळा परिसर नवचैतन्याने भरून जातो. जणू सगळीकडे निसर्गाने हिरवा गालीचाच पसरलेला आहे. पावसात निसर्गातला जवळ जवळ प्रत्येक घटक बहरतो आणि फुलतो. आपसूकच मग धुक्यात हरवलेली घाटवाट, डोंगर, गड-किल्ले इत्यादी ठिकाणी भटक्यांची पावले वळायला लागतात.



पावसाळ्यात सह्य़ाद्रीत फिरायला जी मजा आहे ती कशातच नाही असं मला वाटतं. पावसाळ्यातलं धुकं, सर्वत्र दिसणारी हिरवळ मन मोहून टाकते. हे दृश्य पाहून ह्यापेक्षा सुंदर काहीच नाही असं वाटायला लागतं. काही ट्रेक हे असेच परतीच्या पावसात करण्यासाठी आपण राखून ठेवलेले असतात.  पावसाळी भटकंतीचा पुरेपूर आनंद देणारा तसाच एक ट्रेक म्हणजे ‘भोभी’ (BhoBhi) भोरगिरी ते भीमाशंकर ट्रेक मागील ट्रेक झाल्यानंतर लगेच १२- १३ ऑक्टोबर करायचा ठरवला आणि योगायोग म्हणजे व्या ट्रेक दिवशी कोजागिरी पौर्णिमा देखील आली आणि मग काय क्यंपिंग चा आनंद घेण्यासाठी दुग्दशर्करा योगच चालून आला आणि लगेच अर्ध्या तासातच ३० ट्रेकर आणि विशेष म्हणजे ३ चिमुकले Trekkers  तयार झाले.
आणि तो दिवस उजाडला १२ तारखेला संध्याकाळी ४ वाजता आम्ही २५ Trekers घेऊन भोरगिरी कडे निघालो आणि आळेफाटा येथून आमचे कामार गाव चे ६ मित्र आम्हास जॉईन झाले.पुढे घोडेगाव येथील प्राचीन महादेव मंदिरात रात्रीचे जेवण करून पुढील प्रवास करण्यास निघालो

भोरगिरी ते भीमाशंकर या ट्रेकची सुरवात अर्थातच भोरगिरी या गावापासून होते. पुणे जिल्ह्य़ाच्या उत्तर भागात असणाऱ्या खेड (राजगुरूनगर) तालुक्याच्या एका टोकाला अत्यंत टुमदार, छोटंसं आणि निवांत गाव वसलेलं आहे ते म्हणजे भोरगिरी.  भीमा नदीचा उगम सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील भीमाशंकर अभयारण्यामधे होतो. पुढे भीमा नदी भोरगिरी जवळून वाहत जाते. चास मार्गे जाताना वाटेत भीमा नदीवरील बांधलेले आणि पावसाळ्यात तुडुंब पाण्याने भरलेले चासकमान धरण पाहण्यासारखे आहे.

भोरगिरी गावात येताच डांबरी रस्ता संपतो. गावाच्या सुरवातीलाच पुरातन असे कोटेश्वराचे मंदिर आहे. आणि तेथेच आमची मुक्कामाची सोय होती.रात्री ११ वाजता तिथे पोहचल्यावर लगेच कोजागिरी ची तयारी चालू झाली.कुणाच्याही चेहऱ्यावर थकवा जाणवत नव्हता. सर्व्ह नवीन ट्रेकर नी देखील चूल लावण्या पासून दूध सर्वांना वाटण्या पर्यंत खूप मदत केली. भोभी ट्रेक सुरु करण्याआधी प्रत्येक भटक्यानी थोडा वेळ काढून हे कोटेश्वराचे प्राचीन मंदिर नक्की पहावे. आता त्याजागी नविन सिमेंटचे मंदिर उभारलं आहे. आजकाल सगळ्याच जुन्या मंदिरांना जीर्णोद्धाराचा नवीन साज चढत आहे. सिमेंट, मार्बल आणि ऑइलपेंटच्या रंगांचे थर चढवून मंदिरे चकाचक होत असली तरी त्यामुळे मंदिर परिसरात असलेल्या अनेक जुन्या पुरातन वास्तू, शिलालेख तसेच भिंतींवर असणारे कोरीवकाम नाहीसे होत आहे. भोरगिरी गावात असणारे कोटेश्वराचे प्राचीन मंदिर देखील याला अपवाद नाही. पण पुरातन मंदिराचे अनेक अवशेष व काही मूर्त्या या मंदिराच्या परिसरात आजुबाजूला विखुरलेल्या पाहायला मिळतात. त्यावरुन या मंदिराच्या पूर्वी असणाऱ्या भव्यतेची कल्पना करता येते.

दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंज याने हे कोटेश्वराचे मंदिर बांधले असे म्हणतात. झंज राजाने त्याच्या आयुष्यात एक महान अथवा उत्कृष्ट म्हणता येईल असे काम केले ते म्हणजे गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. त्यांतील हे एक प्राचीन शिवालय आहे.
 सकाळी ६ वाजता उठून आम्ही तिथेच पोहे करण्यासाठी तयारी चालू केली.पोहे खाऊन झाल्यावर
कोटेश्वराचे दर्शन झाल्यानंतर मंदिरापासून फक्त २०० मीटर पुढे असणाऱ्या भोरगिरी गावाकडे आम्ही आमचा मोर्च्या वळवला गावाजवळ येताच उजव्या बाजूला अनेक मोठमोठ्या डोंगरांच्या सानिध्यात एक पिटूकला आणि गोलाकार डोंगर त्याच्या अर्ध्या उंचीवर खोदलेल्या लेण्यांमुळे आपले लक्ष वेधून घेतो. हाच तो भंवरगिरी ऊर्फ भोरगिरीचा किल्ला. किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून जरी ६८६ मीटर इतकी असली तरी पायथ्यापासून तो फक्त दीडशे मीटर उठवला आहे. त्यामुळे भोरीगिरी गावाच्या पाठीमागे उभा असलेला हा किल्ला सर करायला जास्तीत जास्त अर्धा तास तर किल्ला पाहून खाली येण्यास एक तासाचा कालावधी लागला. भोरगिरी-भीमाशंकर ट्रेक करणाऱ्या मित्रांनी भोरगिरीचा हा छोटासा किल्ला भीमाशंकर मंदिराच्या मार्गाला लागण्याआधीच बघून घ्यावा.

 भोरीगिरी गावात आम्ही पाण्याच्या बाटल्या भरून  आपल्या मुख्य ध्येयाकडे ते म्हणजे भीमाशंकरकडे निघालो.

भोरगिरी गावातून भीमाशंकर फक्त आठ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे. तीन तासांचा सोपा ट्रेक पण हा प्रवास मात्र शब्दात वर्णन करणं खरोखरच अवघड आहे. सह्याद्रीतील ही एक आगळीवेगळी वाट ज्यामध्ये काही ठिकाणी चढण काही ठिकाणी उतरण आणि वाटेवर आहे ते भीमाशंकरचं घनदाट अभयारण्य. मान्सून नंतर विविध फुलांनी नटलेली डोंगर रांगेतून रस्ता छान वळत वळत भीमाशंकरच्या जंगलात जातो. हि वाट आहे मात्र खूप मस्त. कधी भीमा नदीच्या पात्रातून मोठमोठ्या दगड धोंड्यांनी भरलेली, कधी दाट जंगलातून जाणारी तर कधी अगदी बैलगाडी जाईल एवढी अरुंद पाउलवाट. तरी
भोरगिरी गावातून भिमा नदीचा प्रवाह डाव्या बाजुला ठेउन मळलेल्या पायवाटेने आपला प्रवास भीमाशंकरकडे सुरु होतो. गर्द झाडीतून वाटचाल करत एक छोटा डोंगर चढून आपण दोन डोंगरांच्या घळीत येतो. येथून पुन्हा पुढच्या डोंगरावर जाण्यासाठी प्रशस्थ पाय-यांची वाट सुरु होते. दुसरा डोंगर चढल्यावर आपण भोरगिरी भिमाशंकर या कच्च्या रस्त्यावर येतो. येथून मात्र पठार सुरु होते. या प्रवासात भीमाशंकरच्या जंगलात आढळणारे शेकरू हमखास दिसतात फक्त जंगलात फिरताना तुम्ही शांत राहायला हवे आणि तुमची नजर शोधक हवी. भीमाशंकर म्हणजे तर महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी असणाऱ्या शेकरू (इंडियन जायंट स्क्विरल) या मोठ्या खारींचे माहेरघर. सदाहरित, निम सदाहरित जंगलात शेकरूचे वास्तव्य असते. उंच झाडावरच शेकरू घर बांधते व अगदी माकडासारखे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत ते आपला प्रवास करते. आकाराने खारुताईपेक्षा बऱ्यापैकी मोठे असले तरी शेकरू प्रचंड लाजाळू प्राणी आहे. अश्या या सर्वांगसुंदर शेकरूसाठी तरी भीमाशंकरसारखी सदाहरित जंगले वाचवणे खूप गरजेचे आहे.
गावातून निघाल्यापासून तासाभरात आम्ही मोठय़ा पठारावर येतो. आता मात्र भिमा नदीचा एक मोठा प्रवाह आपला मार्ग अडवतो. हा प्रवाह उथळ असला तरी पावसाळ्यात येथे पाण्याला जोर असतो. अशावेळी रोप बरोबर बाळगावा.पण पाण्याचा प्रवाह हा अगदीच थोडा असल्यामुळे  हा प्रवाह सहजच अाेलांडला. साधारण १५ मिनिटे चालत गेल्यावर वाटेला दोन पायवाटा फ़ुटतात. सरळ जाणारी मोठी कच्ची पायवाट थेट भिमाशंकरला जाते तर वाटेच्या डाव्याबाजुला असलेला भिमा नदीला मिळणारा प्रवाह ओलांडून एक छोटी अस्पष्ट पायवाट दाट जंगलात घुसते. हि छोटी पायवाट थेट गुप्त भिमाशंकरला घेऊन जाते. त्यामुळे वेळ वाचवण्याच्या दृष्टीने भीमाशंकरकडे जाताना या वाटेने जावे े गुप्त भिमाशंकर मार्गे जाणारी पायवाट घेण्यामागचे दुसरे कारण म्हणजे या वाटेवर लागणारे एक सुंदर बांधीव टाके किंवा पुष्करणी. नितळ पाण्याने काठोकाठ भरलेली पुष्करणी.

पुष्करणी पाहून तिथूनच पुढे जंगलात घुसणाऱ्या पाउलवाटेला लागलो. येथून साधारण १५ मिनिटे वर चढत गेल्यावर आम्ही भिमाशंकरहुन गुप्त भिमाशंकरला जाणार्‍या वाटेवर पोहोचलो. भोरगिरी ते भीमाशंकरच्या वाटेवर पहिल्या आणि या शेवटच्या टप्प्यात गर्द वनराई आहे. उंचच उंच झाडांमुळे तयार झालेला हा घनदाट जंगलाचा पट्टा जरा गूढच वाटतो. इतकी गर्द झाडी असलेलं जंगल जिथे दिवसासुद्धा सूर्यकिरण पोहोचू शकत नाहीत. ऐन वर्षा ऋतूत आलात तर येथे असंख्य रानफुले आणि भूछत्रे फुललेली असतात.
जंगलातून बाहेर पडताच समोर खळाळत वाहणारा एक मोठा प्रवाह दिसतो. हा प्रवाह म्हणजेच भीमा नदी. भीमाशंकर येथे मुख्य मंदिराच्या थोडे अलीकडे एका कुंडात प्रकट झालेली भीमा नदी पुढे लुप्त होते आणि पुन्हा भीमाशंकर मंदिराजवळ प्रकटते. मंदिरापासून पुन्हा खळाळत वाहात जाते आणि दाट जंगलातील तब्बल दोन किमीचे अंतर कापून एका धबधब्याचे रूप घेते. हाच तो प्रवाह. हा धबधबा जेथे पडतो तेथे एक नैसर्गिक पिंड तयार झाले तेच हे गुप्त भीमाशंकर. या प्रवाहात ५ मिनिटे खाली उतरुन गेल्यावर  गुप्त भीमाशंकरजवळ पोहोचलो.
ीमेचा मोठा प्रवाह. ह्याच प्रवाहाचा धबधबा होऊन गुप्त भिमाशंकर येथे पिंडीवर पाणी पडते


गुप्त भीमाशंकर

गुप्त भिमाशंकर पाहुन पुढे मळलेल्या पाउलवाटेने भिमाशंकर मंदिराकडे निघालो. येथून साधारण अर्ध्या तासात आम्ही भीमाशंकर मंदिरापर्यंत पोहचलो.जसजसे भीमाशंकर मंदिराकडे जात होतो तस तसे. या मार्गावर आपल्याला अचानक माणसांची वर्दळ वाढलेली जाणवते आणि भीमाशंकराचे मंदिर आता जवळच आले आहे याची पावती मिळते. आत्तापर्यंतच्या पायी प्रवासात  नजरेला पाहायला मिळालेलं स्वच्छ जंगल अचानक लेज, कुरकुरे, बिस्कीट यांच्या रॅपर्सनी भरून गेलेले दिसते. आत्तापर्यंत प्रवाहांना असणारा फेसाळ, दुधी रंग अचानक बदलून आपल्या अवतीभवती असणारा प्लॅस्टिकचा कचरा, फुलं, मैलामिश्रित घाण बरोबर घेऊन वाहताना दिसायला लागतो. अन् आपण ओळखायचं की, भीमाशंकर आता अगदी हाकेच्या अंतरावर आलंय. आतापर्यंत निसर्गसंपन्न असलेली ही पायवाट आता मात्र अचानकच नकोशी वाटायला लागते.
 आम्ही मात्र त्या गर्दीत न शिरता लांबूनच शिवाचं दर्शन घेतलं आणि परतीच्या वाटेवर तिथेच दुपारचे जेवण करून निघा.लो


या ट्रेकसाठी शक्यतो श्रावण महिना टाळावा कारण भीमाशंकर हे प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असल्यामुळे श्रावण महिन्यात येथे अतोनात गर्दी असते. 
 भोभी हा सह्याद्रीमधला एक नितांत सुंदर ट्रेक. पण हा ट्रेक करत असताना भीमाशंकर अभयारण्यातील निसर्ग, जंगल आणि वन्यप्राणी यांना आपल्या मानवी हस्तक्षेपाचा कोणताही त्रास होणार नाही याची काळजी मात्र प्रत्येकाने अवश्य घ्यावी
शब्दसंकलन -
सचिन भांड
🚩सह्याद्री Trekers🚩
श्रीरामपूर.

No comments:

Post a Comment

देवभूमी यात्रा

  ​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ​‘मनात भक्ती...