Wednesday, November 16, 2022

किल्ले लिंगाणा!!!

 _किल्ले लिंगाणा!!!

दि.१३ नोव्हेंबर २०२२

तारीख ९ ऑक्टोबर वेळ सकाळची घड्याळ्यात अदांजे ०८ वाजलेले असताना पावसाची संतत धार  होती. हवेत गारवा भरला होता आणि अशातच माझा फोन वाजला दादा इकडे अजून climate खूप खराब झालय काय करायचं गेले महिनाभर ह्या ट्रेक साठी काय काय केले त्याचा एक पटच डोळ्यासमोरून सरकला. कारण सर्व समीकरणे जुळवून आम्ही दुपारी ट्रेक ला निघणार होतो. तो ट्रेक होता लिंगाणा राजधानी रायगडच्या माथ्यावरून जगदीश्वर कडे आल्यावर काळ नदीच्या खोऱ्यातील एक सुळका कायम लक्ष वेधून घ्यायचा नाव त्याचे  किल्ले लिंगाणा. कधीतरी चढाई करूच अशा इराद्याने रायगडच्या गोड आठवणी आणि लिंगाण्याचे स्वप्न घेवूनच रायगड उतरायचो.  काही वर्षांपूर्वी मी केलेल्या लिंगाणा  ट्रेक चा वाईट आठवणी चा अनुभव असल्याने मी  पावसात जाण्याची  जोखीम पत्करली नाही आणि ट्रेक पुढे घ्यायचा ठरवला. पुढे जेंव्हा ठरलेल्या दिवशी ट्रेक जायचा ठरला . तो दिवस उजेडला लिंगाणा करायचाच त्या दृष्टीने सर्व तयारी आधीच झाली होती. एक भटका ट्रेक करण्यासाठीच्या अडचणी दूर करण्यासाठी कोणत्या थराला जाईल हे सांगणे कठीण. या ट्रेकला तशा सतराशे साठ विघ्न, पण साऱ्या अडचणींवर मात करून १३ नोव्हेंबर या तारखेला नेहमी प्रमाणे उशीर होत आम्ही १८ लोकांच्या चमू ने श्रीरामपूर सोडले.

नेहमी फ्रेश मनाने ट्रेकला जाणारा मी पण मलाही आज काहीतरी वेगळीच भीती जाणवत होती.कारण लिंगाणा असा एक ट्रेक आहे जितका तुम्हाला जास्त उशीर होईल तितका उशीर ट्रेक पूर्ण करण्यास होणार होता.कारण मी केलेल्या मागील  ट्रेक ला आमचा शेवटचा माणूस रात्री 2 वाजता पायथ्याला होता.त्यातच भर म्हणून कि काय रात्री पुण्यातल्या ट्राफिक मुळे पुण्यातून बाहेर पडायला तब्बल दोन तास लागले.त्यातच गाडीमध्ये बऱ्याच दिवसांनी सगळे मुल च ट्रेक ला असल्याने धिंगाना आरडाओरड ला तर सीमा नव्हती अशा या परिस्थितीत वेल्हा सोडला तसा चमत्कारीक रस्ताने आपले रंग दाखवायला सुरवात केली. गाडी १७ सिटर असल्याने तीचा बांधा तसा मोठा. त्यात अपेक्षित सिटापेक्षा जास्त मंडळी. गाडीची चाके आपल्या उर्जेप्रमाणे फिरत होती पण चमत्कार हा होता की गाडी पुढे जात नव्हती झाल सगळ्यांना खाली उतरावे लागले. आणि उतार आला की परत गाडीत बसायचो  पुन्हा चढ आला की पुन्हा उतरत होतो …. ड्रायव्हर डाव्या बाजुची दरी पाहून आधीच सावध व्हायचा आणि सगळ्याना खाली उतरायला लावायचा. ड्रायव्हर तर इतका वैतगला होता की याला दुसरा मार्ग नाही का अस सारख विचारत होता पण पर्याय च नव्हता

 अशातच पहाटे ०५ वाजता मोहरी गाव गाठले तिथे आमचे शिलेदार मंडळी आमची वाटच पहात होती आणि क्षणाचा ही विलंब न करता आम्ही आमचे सर्व सामान आवरून ट्रेक ला सुरवात केली.काळोखी रात्र आणि जंगलातून जाणार रस्ता तुडवत आम्ही बोरट्याच्या नाळेच्या तोंडाजवळ पोहचलो.



आता एव्हाना बऱ्यापैकी उजेड पडायला सुरुवात झाली होती.स्वतःचा तोल सावरत खडतर अशी ती नाळ उतरून आम्ही  रायलिंग पठाराच्या बाजूने दोरीच्या साह्याने तो कडा सर केला आणि समोर दिसु लागला तो भला मोठा लिंगाणा सुळका


आणि थोडयाच वेळात आम्ही लिंगणाच्या पायथ्याजवळ पोहचलो आणि सोबत घेतलेल्या नाष्ट्यावर ताव मारून सर्वांना equipment ची माहिती देऊन हर्णेस चढवून आम्ही चढाईला सुरवात केली .आमच्याकडे ट्रेकिंग चा अनुभव खूप होता पण एक दोघे सोडले तर climb च्या बाबतीतील अनुभव कमी होता त्यात काही नवीन मेम्बर यामुळे आम्हास पहिली रेज गुंफे पर्यंत चढून जाण्यास दुपारी ११.०० कधी झाले हे कळलेच नाही. पुढे आधीचा एक ग्रुप असल्याने २५-३० मिनिटामध्ये  आम्ही पुढील चढाई ला सुरवात केली. अतिशय कठीण अशी हि पुढील चढाई होती ती, कारण जस जसे एकेक टप्पा पार करत होतो तसतसे सुळका निमुळता होत होता त्यातच दोन्ही बाजूला महाकाय दरी असे आम्ही प्रत्येक टप्पा पार करत लिंगांना चा माथा गाठला खूप जल्लोष केला, लांबूनच किल्ले रायगड चे दर्शन घेतले पहिल्या चढाई चे ते क्षण कॅमेरा मध्ये फोटो स्वरुपात घेतले आणि परतीचा मार्ग निवडला, तेव्हा दुपारचे ०३ वाजले होते लगेच rappeling करून आम्ही गुफे पर्यंत येई पर्यंत  ०५वाजले होते. आता अंधार पडायच्या आत आपण नाळ चढायची म्हणून सर्वांनी सपसप आपली पावले उचलली पण माझ्यासोबत शेवटी काही वयस्कर मंडळी असल्यामुळे त्यांच्यासोबत थांबणे गरजेचे होते नाळेपर्यत येवोस्तोवर आता बऱ्यापैकी अंधार पडलेला होता अशा या परिस्थिती माझ्या सोबत केशव गगे असल्यामुळे सोबत च्या मंडळींना खडतर नाळ चढवून आम्ही सुटकेचा श्वास सोडला आणि थोडी विश्रांती घेऊन गाव गाठले एव्हाना आमची मंडळी जेवण करून आमची वाटच पहात होती आम्ही देखील जेवण करून गाडीत बसलो प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील लिंगाणा सर केल्याचे जे समाधान होते ते स्पष्ट दिसत होते आणि हीच मंडळी सुळका चढताना म्हणायची मस्त रविवार होता घरीच अराम केला असता उगाच हे धाडस करायला आलो पण आता तीच मंडळी एक विलक्षण सुख देणारा अनुभव घेत होती आणि आम्ही श्रीरामपूर कडे मार्गस्थ झालो.

स्वराज्याची स्वप्ने ह्या दुर्गांच्या संगतीने, साक्षीने साकारलेले, या डवरत्या- फुलत्या दुर्गांनीच आपल्या मायेची पाखर घातली. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर या पवित्र गडकोटांनीच या भूमीचे शतकानुशतके गुलामगिरीचे परचक्र परतवले. सह्याद्रीतला प्रत्येक किल्लाने इतिहासात एक सुवर्ण पान लिहिलेले. पण हा  लिंगाणा थोडा दुर्दैवी म्हणावा लागेल. वेगळ्या कार्यासाठी स्वराज्यात याचा वापर व्हायचा. लिंगाणा किल्ला म्हणजे गुन्हेगारांचा कर्दनकाळ. सर्वात वाईट शिक्षा काय असेल तर ती लिंगाण्याची शिक्षा. मरण्यासाठी इथे प्रत्येकाला स्वांतत्र्य. इतिहास काळातील संभाजी-गोदावरी प्रसंग चर्रकन मनाला वेदना देवून गेला.

लिंगाणा माथा गाठणे हे तस पाहिलं तर भल्याभल्यांचं स्वप्नच असते.आमच्या जवळपास सर्वच शिलेदारांनी हे स्वप्न सत्यात उतरवल  बलाढ्य आकार आणि थरार आठवणीतल्या साठवणीमधून कधीच न मिटनारा. एक ओळ मनात रुचली की

       “जिंदगी एक सफर है सुहाना … यहां कल क्या हो किसने जाना।”

सचिन भांड

सह्याद्रि ट्रेकर्स, परिवार





No comments:

Post a Comment

देवभूमी यात्रा

  ​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ​‘मनात भक्ती...