Thursday, August 10, 2023

बहुप्रतिक्षित पन्हाळगड ते विशाळगड पदभ्रमंती मोहीम (भाग ०१)

 


बहुप्रतिक्षित पन्हाळगड ते विशाळगड पदभ्रमंती मोहीम

दि.०५ आणि ०६ ऑगस्ट २०२३

भाग :-०१


काही निवडक आवडता ट्रेक झाल्यावर त्या ट्रेक चा वृतांत हा हवाच आणि या ट्रेकला तर हवाच ना ! खरं सांगायचं झालं तर गो.नी.दांडेकर, प्र.के.घाणेकर सारख्या इतिहास तज्ञ मंडळींनी बरेचशे लिखाण केलेल्या असल्यामुळे आणि सिनेमाद्वारे पावनखिंडीचा इतिहास आपल्या समोर आलेला असल्यामुळे मला खास करून या ट्रेक विषयी काहीही  लिहिणे म्हणजे मोठेच धाडस वाटत आहे, मात्र प्रत्येक ट्रेकरची जशी चाल वेगळी तशी प्रत्येकाची लेखनशैली सुद्धा वेगळी ! आणि याशिवाय या आवडत्या ट्रेक विषयी"मी ट्रेकला जावून आलो  फोटो काढले नाही आणि  वर्णन लिहिले नाही", तर, तो ट्रेक कसा पूर्ण झाला म्हणणार.म्हणून या ट्रेक चा इतिहासात फारसे न डोकवता पन्हाळगडावरून  शिवाजी महाराजांची पालखी धरून सलग २० तास धावणाऱ्या त्या अज्ञात भोईंना  श्रद्धांजली अर्पण करून या वर्णनाला सुरुवात करणे योग्य होईल.

भयानक धाडसी आणि जिवावर बेतू शकतील असे आखलेले बेत नंतर कसे कुतूहलाचा आणि संशोधनाचा विषय बनतात , याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे "पन्हाळगड ते विशाळगड" हा ट्रेक ! शिवरायांचे असामान्य धैर्य, बाजीप्रभूंचे अतुलनीय शौर्य, मर्द मराठ्या मावळ्यांची असीम स्वामीनिष्ठा, या सर्वांची साक्ष देऊ शकणारे जंगल, नद्या , ओढे म्हणजे "पन्हाळगड ते विशाळगड" हा ट्रेक! मसाईचे हिरवेकंच पठार, पुन्हा पुन्हा मन ओढ घेईल असे पांढरे शुभ्र ओढे आणि रौद्रसुंदर पावनखिंड म्हणजे "पन्हाळगड ते विशाळगड" हा ट्रेक! (वर्णन संपलेले नाहीये)

आत्ता कुठे वर्णन सुरु होतंय..

वरील सर्व गोष्टी ऐकून वाचून आधी २२ आणि २३ जुलै चा बेत आखला पण प्रचंड गर्दी आणि पाऊस या मुळे मी ही मोहीम ५ आणि ६ ऑगस्ट ला घेण्याचे ठरवले आणि पन्हाळा येथील संकेत बरोबर चर्चा करून  या ट्रेकची आखणी केली. 



               ०४ तारखेला रात्री ०७ वाजता निघायचे  ठरले होते. पण नेमकी  मेडिकल वर आज गर्दी उसळली होती सर्व जण "वेळेवर" जमून जाण्याचा ट्रेक करणे हे माझे एक स्वप्न आहे. बहुधा ते कधी प्रत्यक्षात येईल काय माहित.  असो.  रात्री ०८  वाजता आमचा श्रीरामपूर मधून प्रवास चालू झाला  ह्या ट्रेक ला महिला सदस्य नसल्यामुळे  बस मध्ये कल्ला तर होणारच  नेहमीचा दंगा आणि हास्याचे सातमजली फवारे चा आनंद घेत प्रवास पार पडला. प्रवास आणि झोप हे जरा आमच्या बाबतीत म्हणाल तर ३६ चा आकडा असल्या सारखे  त्यामुळे  नेहमीप्रमाणे रात्रभर जागूनच काढावी लागली


दिवस पहिला : ०५ ऑगस्ट : 

पन्हाळा आणि हिरवीगार मसाईची चादर

सकाळी ०७ वाजता आम्ही पन्हाळगड ला पोचलो. पावसाळा आणि निसर्ग याविषयी वाचलेली सर्व वर्णने आठवावीत अशी दृश्ये आम्हाला साद घालत होती जणू म्हणत होती : "०२ दिवस मला डोळ्यांत भरून घ्या, मनात साठवून घ्या, माझ्याबरोबर जरा निकोप बना." 

       पन्हाळा किल्ल्याला महाभारतापासून इतिहास आहे. पराशर मुनींचे येथे वास्तव्य होते. तसेच पूर्वी नाग लोक येथे राहत असत. यावरून या जागेला "पन्नगालय" (नागांचे घर) असे नाव पडले. पुढे इ.स. १११२ साली शिलाहार राजा भोजने या ठिकाणी किल्ला बांधला व त्याला  "पन्हाळा" हे नाव दिले. त्यापुढे यादव राजा सिंधन , आदिलशाह यांनी या किल्ल्यावर राज्य केले आणि १६५९ साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. किल्ला संपूर्ण पाहावयाचा म्हटले तर अख्खा दिवस सुद्धा कमी पडेल, इतकी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. पण उशीर झाल्यामुळे जास्त ठिकाणे  न पाहता बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले तसाही आमचा ट्रेक पन्हाळगड "आणि" विशाळगड असा नसून पन्हाळगड "ते" विशाळगड असा पदभ्रमंती चा होता. 

चहा आणि नास्ता करून आमच्या सोबत असलेल्या पन्हाळा येथील संकेत ने थोडक्यात ह्या पदभ्रमंती चा इतिहास आमच्या समोर मांडला आणि पन्हाळगड च्या बागेला प्रदक्षिणा घालून.राजदिंडी चा मार्ग धरला, जेथून आम्हाला गड उतरावयाचा होता.जेथून राजे सिद्धी जौहरच्या वेढ्यातून निसटले होते.  आता आम्हाला अनेक वाड्या पार करायच्या होत्या. त्यातील पहिली होती: "तुरुकवाडी". जेमतेम अर्ध्या तासात या वाडीवर पोचलो.येथून एक डांबरी रस्ता म्हाळुंगे या गावी जातो, मात्र आम्हाला मसाई पठारावर जायचे असल्याने डोंगरातील वाट धरून त्या वाटेने पुढे कूच केले.  हा रस्ता बराच चढणीचा होता.ओढ्याचे गार पाणी चेहऱ्यावर मारून पुढे निघालो. म्हाळुंगे गावाचे धनगर वाटेत दिसत होते. चढणीची वाट आता एकदाची संपली आणि कोकणातल्या एखाद्या आडगावी फिरत असताना जसा अचानक समुद्र समोर दिसून वेडे व्हावे, तसे आमचे झाले.




मसाई पठार 


 समोर साक्षात हिरवा समुद्र पसरला होता. अथांग हिरवा.. नजर जाईल तिथपर्यंत हिरवा... क्षितिजापर्यंत हिरवाच !!! मसाईचे जादुई पठार याचि देही याचि डोळा पहिले. डोळे भरून पहिले. "धरतीने हिरवा शालू पांघरणे" हा वाक्प्रचार इथे आल्यावरच बनला असेल अशी खात्री झाली. भारताला जर कधी ऑलिम्पिक स्पर्धा भरवायला मिळाल्या, तर सर्व खेळांची मैदाने सामावून सुद्धा उरेल, इतके विस्तीर्ण हे पठार आहे. येथे फोटो-सेशन झाले हे सांगणे न लगे.पठारावर चारचाकी, दुचाकी गाड्या घेऊन येणाऱ्या लोकांना बंदी आहे; त्यामुळे चराऊ गवत कमी होते आणि येणारी माणसे कचरासुद्धा करतात हे अगदी रास्त आहे. पठारावरून मार्ग कापायला सुरुवात केली.

वाटेत एक मंदीर लागले, मात्र ते मसाईचे नव्हते. "देखल्या देवा दंडवत (तो मात्र मनापासून)" करून पुढे निघालो. मसाईचे मंदीर अपेक्षेपेक्षा लांब होते. तेथे पोचेपर्यंत अनेकदा पावसाची रिपरिप लागली. श्रावण अगदी क्षणात ऊन आणि क्षणात पाऊस ही त्याची ओळख जपत होता. मंदिरात देवीचे दर्शन घेऊन सोबत आणलेल्या चपाती भाजी वर उभ्या उभ्या थोडाफार ताव मारून पुढील रस्ता समजावून घेऊन  तसे निघालो. वाट चुकवण्यापुरते धुके आम्हाला तसे आम्हला आडवे आले नाही .

त्यानंतर विनाथांबा कुंभारवाडी कडे कूच केली रस्त्यात लहान लहान मुलांनी आम्हाला "दादा , गोळ्या द्या" असे विनवून हेलावून सोडले. गोळ्यांचा मुबलक साठा असल्याने त्यांच्या हातावर गोळ्या ठेवून आम्ही कुंभारवाडीकडे प्रस्थान केले.वाटेत लहान मुले चहा चहा ची किटली घेऊन उभी होतीच मग काय सह्याद्रि आणि चहा ही तर माझी कमकुवत बाजू त्यामुळे सह्याद्रि मध्ये चहा ना घेताच पुढे कसे जाणार  आता बराच कच्चा  रस्ता सुरु झाला होता. चिखल आणि पाणी यांनीच जणू रस्ता बांधला होता. कुंभारवाडी वाडीवरून खोतवाडी कडे जाताना डांबरी रस्ता लागला या रस्त्याने जाताना डावीकडे कुंवार खिंड दिसते. 



कुंवारखिंड (खडकमाळ आळी :-)) 

एकावर एक असे पांढऱ्या खडकांचे थर रचलेले असे ते उंच खांब मोठे सुंदर दिसत होते. खोतवाडी येण्यास बराच वेळ गेला. तिथे आमची गाडी आलेली होती ती या साठी की कुणाला काही त्रास झाला तर त्यांना गाडीने मुक्कामाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी तेथेसुद्धा तेथील लहान मुलांना गोळ्यांची वाटणी झाली.वाटेत रस्त्याच्या बाजूला भात लावणी चालू होती मग आम्हला भातलावणी करतानाच फोटो काढण्याचा मोह आवरलं नाही आणि ती सुद्धा हौस करून घेतली भाताची खचरे चिखलाचा रस्ता तुडवत करपेवाडी इथे आमचा मुक्काम ठरला होता. वाटेत अनेक गावकऱ्यांना आम्ही वाट आणि लागणारा वेळ याबद्दल विचारले. प्रत्येकाचा अंदाज निराळा!  चिखलातून जाताना बूट खूप "खालच्या थराला" जात होते , त्यांना बरोबर घेऊन जाणे म्हणजे एक दिव्यच होते. करपेवाडीपर्यंत उजेडाचा वेळ वाया घालवून उपयोग नव्हता. प्रत्येक वाडीमध्ये पाणी मुबलक, भातशेते तर असंख्य ! दिवसभरात जेवढे श्वास घेतले असतील तेवढीच भाताची रोपे आम्ही पहिली असतील. 



आपसांत बोलणे आता जरा कमी झाले होते. वाडी काही केल्या येत नव्हती. वाडी येईपर्यन्त अविरत चालणे याशिवाय पर्याय नव्हता. सहा च्या आसपास दूरवर एक घर दिसले. ती वाडी म्हणजे च करपेवाडी जिकडे आमची राहायची सोय होती आणि मनाची चलबिचल क्षणार्धात थांबली.सर्वांनी तेथील एका घरात फ्रेश होऊन मॅट अंथरून पाठ टेकवली चहा आणि खाऊची देवाणघेवाण करून थोडा वेळ गप्पा मारल्या. दमलेल्या शरीराला अन्नापेक्षा विश्रांतीची जास्त  गरज होती. कनकने आणलेली वेदना शामक मलमे बाम या मुळे सार घर त्या वासाने सुहासिक झाले होते.थोड्याच वेळात गावाकडील जेवणावर ताव मारून त्याबद्दल मनोमन कौतुक करून साडेनऊ वाजता आम्ही झोपलो. रात्री सारखे कुणी उठले तर दरवाजा बंद करायला सांगावे लागायचे कारण कुणीही प्राणी आला असता तरी आम्ही त्याचे भोजन झालो असतो कारण उठून पळण्याचे त्राण कुणाच्याच अंगात नव्हते. आजच्या दिवसाची चाल: अंदाजे २२  किलोमीटर !  

(क्रमशः)..



सचिन भांड पाटील

सह्याद्रि परिवार



No comments:

Post a Comment

देवभूमी यात्रा

  ​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ​‘मनात भक्ती...