Friday, September 16, 2022

सफर एका ऐतिहासिक राजमार्गाची


 चावंड आणि नाणेघाट ट्रेक

दि.११ सप्टेंबर २०२२

आम्हा सह्याद्री च्या भटक्यांना  फक्त भटकायला निम्मित लागते मग ऊन, वारा, पाऊस काहीही असो भटक्यांना त्याची फिकीर नसते कारण ह्या  सह्याद्रीचा मुकुटमणी शोभणारे गडकिल्ले आम्हास  सतत खुणावत असतात. त्यात पावसाळ्यातील भटकंती म्हंटल्यावर आमच्या परिवाराची कार्टी तर गुढघ्याला बाशिंग बांधूनच तयार. आमचं तर आता अस झालय न जस लग्नाची तारीख धरली की लगबग  चालू होते तसे आमचे फोन वाजायला लागतात सर मी येणार म्हणून.गेली अनेक वर्षे सह्याद्रि फिरतोय  पण गेली ३-४ वर्षांपासून जो काही सह्याद्री पालथा घातला त्यात आमच्या या ठरलेल्या तारखांच्या मोहीमा आजपर्यंत क्वचित एखादी सोडल्यास कधी चुकल्या नाहीत अन त्या कधी चुकणार हि नाहीत. त्याच कारण लिहीत गेलो तर त्यावर एक वेगळा ब्लॉग नक्कीच होईल. त्यामुळेच दरवर्षी प्रमाणे यंदाही पावसाळी ट्रेक चा शेवट अशा ट्रेक ने करायचा ज्याच्या आठवणी चिरंतन मनात कायम राहतील.म्हणूनच काही वर्षांपूर्वी आमच्या ग्रुप ने असच भर पावसात चावंड आणि नाणेघाट केला होता तोच ट्रेक परत करायचा विचार आला . त्यात जीवधन किल्ला अन परिसराशी माझ एक आपुलकी च नात तयार झालय कारण सह्याद्रि प्रतिष्ठान बरोबर काम करताना पायरी मार्ग मोकळा करण्याच्या कामात थोडाफार खारीचा वाटा उचलता आला त्यामुळे तो एक अभिमान मनाशी बाळगून होता.

आमच्या परिवारात काही जणांना तर इतकं व्यसन लागलंय की त्यांचं कायम म्हणणं असत  " कुठंबी चला सर  पण आम्हाला सोडून जाऊ नका".इतकं त्यांचं ट्रेक साठी काही पण अन कधी पण अस झालंय.

    खर तर सह्याद्री म्हणजे दुर्गांची खाण आणि याच बुलंद गडदुर्गांनी नटलेला निसर्गरम्य तालुका म्हणजे जुन्नर. जुन्नर तालुक्यात ८ किल्ले, १२ लेणी समूह, अनेक प्राचीन मंदिरे आहेत. आता आलं पुढच नियोजन निघायची वेळ, पोटापाण्याचा प्रश्न. अहो शिक्षण घेताना कधी एवढं नियोजन केलं नसल तेवढं नियोजन सह्याद्रीतली  मोहीम करायला लागतय पण सगळ्या मोहिमेत माझ्या  सोबत असलेल्या सहकाऱ्यांमुळे नियोजन कस पद्धतशीर असतय. आणि ११ सप्टेंबर ला रात्री १२.३० वाजता निघायचं  ठरल.अन नेहमी सारख ह्या वेळेस तरी आम्हाला निघायला उशीर होणार नाही याची परिपूर्ण दक्षता घेऊन आमचा प्रवास चालू झाला.

सातवाहन काळात प्रतिष्ठान म्हणजे आत्ताचे पैठण हि सातवाहन राजांची राजधानी होती तर जीर्णनगर म्हणजेच आजचे जुन्नर हि उपराजधानी होती. त्यामुळेच प्राचीन काळापासून जुन्नरचे व्यापारी केंद्र म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. त्यात प्रामुख्याने शिवनेरी, चावंड, हडसर, जीवधन, नारायणगड, निमगिरी, हरिश्चंद्रगड, सिंदोळा हे किल्ले येतात तर दार्या घाट, माळशेज घाट, नाणेघाट हे प्रमुख प्राचीन घाटमार्ग येतात.नालासुपारा कल्याण, बंदरातून येणार माल हा जुन्नर मधूनच पुढे जाई याच व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती केली गेली.

आता  जसा जसा चावंड जवळ येत होता तस तस पहाटेच्या कोवळ्या प्रकाशात त्याचा शंकू सारखा दिसणारा आकार, ताशीव कडे, गडाची भव्यता लांबूनच दिसून येत होती. पहाटे ०५:०० च्या सुमारास आम्ही चावंड पायथ्याशी  पोहोचलो तिथे आमचा सह्याद्रि मधील सवंगडी मारुती वाटच पहात होता अजून जराशी काळोखी रात्र असल्याने सर्वांना बस मधेच आराम करावयास सांगितले आणि एक तास आराम करून सर्वजण फ्रेश होऊन तयार झाले. सकाळी ०८ च्या सुमारास गड चढायला सुरुवात केली. गड चढताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एका गोष्टीच सुख मात्र होत ते म्हणजे कोणतही ओझं घेउन न चढण्याच, नाही तर सगळा सरंजाम सोबत घेऊन गड चढायची सवयच लागलीये आम्हाला. चावंडची चढाई तशी काही अवघड नाही अर्ध्यापर्यंत प्रशस्त सरकारी पायऱ्या केलेल्या आहेत तर पुढच्या भागात कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत या मार्गाने तासाभरात गडावर येता येते. जसजसे किल्ल्याच्या दिशेने वाटचाल सुरु होती तसतसे खाली उंचावरून नजर पुरेल त्याठिकाणी निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याचा आविष्कार पहायला मिळत होता तो नजरेत साठवून घेत पुढे चालत होतो .चावंड किल्ला नेमका कोणी बांधला याचे पुरावे सापडत नाहीत. बहामनीचे साम्राज्याचे तुकडे झाल्यानंतर ज्या प्रमाणे आदिलशाही कुतुबशाही निर्माण झाल्या त्याचप्रमाणे इ .स १४८५ साली मलिक अहमदने निजामशाही स्थापन केली व त्यात त्याला उत्तर कोकण व पुणे प्रांत मिळाला त्यात चावंडचे नाव आढळते. इ.स. १६३६ मध्ये निजामशाहीला मुघल व आदिलशाह यांच्या पासून वाचवण्यासाठी शहाजी राजांनी केलेल्या तहात चावंड मुघलांच्या ताब्यात गेला. गडाला अनेक नावे आहेत चामुंड, चावुंड, चावंड हि नावे गाडावर असलेल्या चामुंडा देवीच्या नावावरून आली असावीत. पुढे स्वराज्यात मावळ्यांनी किल्ला जिंकल्यानंतर महाराजांनी गडाचे नाव प्रसन्नगड ठेवले. पुढे पेशवे काळात राजकीय कैदी ठेवण्यासाठी गडाचा वापर होई. पायऱ्या चढून वर आल्यानंतर कातळात कोरलेला गडाचा दरवाजा लागला त्यावर बारीक गणेश शिल्प कोरलेले आहे.

किल्ले चावंड प्रवेशद्वार

आम्हला गडावर असणाऱ्या सलग सात टाक्यांचे म्हणजेच सप्तमातृका यांचे प्रमुख आकर्षण होते. आम्ही लवकर निघाल्यामुळे अजून तरी गडावर कोणीच न्हवतं फक्त आमचाच ग्रुप होता. दरवाज्यातून डाव्या बाजूने पुढे गड फेरीसाठी निघालो तर वाटेत हरिश्चंद्रगडावर आहे तशीच पुष्करणी पाहायला मिळाली त्यातील पाण्याची अवस्था फारच वाईट होती. पुष्कर्णीच्या देवड्यांमध्ये भग्न अवस्थेत पडलेली महादेवाची पिंड, गणेश मूर्ती आढळली. समोरच पडलेली कमान व त्याखाली महादेवाची पिंड आहे तिथेच तुटलेल्याला अवस्थेतला नंदी आहे. गडावर अशे भरपूर अवशेष वाईट अवस्थेत पडून आहेत त्यावर संपूर्ण गवत माजल्याने ते नजरेस पडत नाहीत व थोडा आडवाटेवरला किल्ला असल्याने सहसा इकडं कोणी फिरकत नाही. पण ह्या आडवाटेवरल्या गडांच्या अनवट वाटा तुडवल्याशिवाय त्या गडाचं अन तिथं घडलेल्या इतिहासच महत्त्व कळत नाही. ह्या सगळ्या वास्तू कॅमेऱ्यात कैद करून घेतल्या.

गडावरील अवशेष

गडाच्या मध्यभागी असलेल्या छोट्या टेकडीवर चामुंडा देवीचे मंदिर आहे. चारही बाजुंनी गडाचा माथा पालथा घातला जिथून गडफेरीसाठी सुरुवात केली तिथे येऊन पोहोचलो पण सात टाक्या कधी मागे गेल्या कळलंच नाही.

सप्तमातृका 

    प पुढे वाट टेकडीवर असलेल्या चामुंडा देवीच्या मंदिराकडे वळवली. चामुंडा देवी प्रामुख्याने राजस्थान, बिहार या प्रदेशात आढळते. हिचे वाहन गाढव, प्रेत, घुबड, गिधाड ध्वजावर अग्नीपुराणाप्रमाणे चार हात शक्ती, मुंड, शूळ ही हिची आयुधे. मंदिरात देवीची शेंदूर लावलेली प्राचीन मूर्ती आहे. आजूबाजूला मंदिराचे जुने अवशेष आहेत आताचे नवीन मंदिर हे गावकऱ्यांनी बांधलेले आहे. गडावरून माणिकडोह धरणाचा सुंदर नजर दिसतो. गड बघून झाल्यानंतर परतीच्या मार्गाला लागलो. आता आमहाला खुणावत होता तो सातवाहनकालीन महाराष्ट्राचा राष्ट्रीय महामार्ग नाणेघाट. गाडीत बसल्यावर शांत कुठं कोण बसतंय, मग एकमेकांची खेचत गाडी नाणेघाटाच्या दिशेनं दिमटीवली. वाटेत अंजनवाळे गावा जवळ एकाच डोंगर रांगेवर असलेली लहान मोठे सुळके दिसतात. हा डोंगर म्हणजे व्हराडी डोंगर गावकऱ्यांकडून या डोंगरात वऱ्हाड लुप्त झाल्याची कथा सांगितली जाते म्हणूनच त्याला वऱ्हाडी डोंगर म्हणतात.

      सह्याद्रीचा कोणताही डोंगर बघितला कि मनात अनेक विचार चालू होतात. त्याचा आकार, त्याची रचना, त्याला काही इतिहास आहे का? त्याचावर काही बांधकाम असेल का? आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे त्यावर जायची वाट कुठून असेल. हे असं सगळ माझ्या डोक्यात घुटमळत असत. जस जस घाटघर जवळ येत होत तसं तस एक हलकीशी धुक्यांची चादर अंगावर येत पुढे येणाऱ्या स्वर्ग सुखाची चाहूल देत होती. नाणेघाटाला पोहचताच वाटेत असलेला भला मोठा दगडी रांजण आपल स्वागत करून आपल्याला दोन हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासात घेऊन जातो. नाणेघाट म्हणजे सातवाहन कालीन महाराष्ट्राचा राष्ट्रीय महामार्ग. नाणेघाटचे बांधकाम सातवाहन काळात इ.स.पू. पहिल्या शतकात हे खोदकाम झाले. नालासोपारा कल्याण बंदरातून येणारा माल जुन्नर हूनच पुढे पैठणला जाई त्यावेळी कोकण व जुन्नरला जोडणारा नाणेघाट हा प्रमुख मार्ग होता.  सातवाहन हे इ.स.पू. २३० ते इ.स. २२० या कालखंडात दख्खनच्या पठारावर राज्य केलेले राजघराणे होते यांचे राज्य वर्तमान महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांच्या भूप्रदेशांत पसरले होते. आंध्र प्रदेशातील धरणीकोट व अमरावती, तसेच महाराष्ट्रातील जुन्नर व पैठण ही सातवाहनांची प्रमुख ठाणी होती. इ.स.पू.च्या पहिल्या शतकात मौर्य नंतर भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारा सातवाहन हा महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश मानला जातो. नाणेघाट रचना हि डोंगर खोदून केलेली आहे. इथं अनेक गुहा आहेत या प्रत्येक गुहे समोर पाण्याचं टाकं पहायला मिळत. इथं असलेल्या दगडी रांजणाचा वापर जकातीचे पैसे टाकण्यासाठी केला जात असे. व्यापाऱ्यांनी घाटाचा वापर केल्याबद्द्दल रांजणात पैसे टाकले जात हा दगडी रांजण म्हणजे त्यावेळचा टोल नाकाच. गणेश मूर्ती, कातळावर कोरलेले हनुमान शिल्प, दगडी रांजण, गुहेत भिंतींवर कोरलेले शिलालेख, या शिलालेखा बाबत सांगायचं झाल्यास हा शिलालेख ब्राम्ही भाषेत सातवाहन काळातील साम्रादनि नागणिका हिच्या काळात लिहिलेला वाचण्यास येतो या शिलालेखात सातवाहन राजांनी जे काही पराक्रम, दानधर्म केले आहेत त्या विषयी चा उल्लेख आढळतो असाच शिलालेख आपल्याला नाशिक जवळील पांडवलेणी इथे देखील आढळतो कातळात कोरलेल्या पायऱ्या स्थापत्य शास्त्राची सारी अदभूत किमया इथं अनुभवायला मिळते.

असा हा राजमार्ग बघून झाल्यावर आम्ही आमचा तांडा नानाच्या अंगठया कडे वळवला खरा पण वर आल्यावर दाटधुक्या मुळे कड्याच्या समोरील दृश्य काहीच दिसत नव्हते आणि बऱ्याच वेळेस पावसाळी ट्रेक ला आम्हाला हुलकावणी देणारा पाऊस या वेळी आमच्या स्वागतास सज्जच होता असा ह्या पावसाचा आणि खळखळनाऱ्या झऱ्यांचा तर काहींनी मनमुराद आस्वाद लुटला त्यात सर्वात म्हणजे आमची जेष्ठ मंडळी अन बाल गोपाळ त्यांचा चेहऱ्यावर चा आनंद पाहून त्यांना कुठलीही घाही न करता त्यांना त्यांचा आनंद घेऊ दिला.आणि सर्वांना सुखरूप खाली आणून आम्ही रिव्हर्स वॉटर फॉल कडे मार्गस्थ झालो.

जस जसे आम्ही धबधब्या जवळ येत होतो तस तसे अधून मधून  धुक्याच्या चादरीतून वानरलिंगी सुळका हळूच डोके वर काढत होता.वानरलिंगी सुळका म्हणजे सातशे-आठशे फूट उंचीचा जीवधन किल्ल्यापासून वेगळा झालेला अजस्त्र अभेद्य बेलाग खडा सुळका. जेंव्हा जेंव्हा जीवधन ला येतो तेव्हा तेव्हा इच्छा होत असते एकदा का होईना हा सुळका सर करायचा पण अजून तरी तो योग् आला नाही पण यावर्षी तरी तो सर करायचाच हा निश्चय करून आम्ही फ़ॉल कडे वळालो.

पावसाळी ट्रेक ला जायच म्हटल कि पावसाच्या सरी अन धबधबा असेल तर अजून मनमोहक वाटत. आणि त्यात जर नाणेघाट ला आलात अन  उलट्या पाण्याचा धबधबा न पाहताच गेला तर तुम्ही ह्या ट्रेक च्या सर्वात अविस्मरणीय क्षणाला मुकलात म्हणून समजा.

येथील खासियत म्हणजे उलट्या पाण्याचा धबधबा.अगदी पावसाच्या सरी कोसळाव्या त्याप्रमाणे डोंगर दऱ्यातील पाणी या ठिकाणी वाहत येते आणि कड्यावरून खाली कोसळण्या ऐवजी उलटे वरती येते. परंतु वातावरणात कुठल्याही प्रकारची हवा नसल्याने आम्हाला  काही तो अनुभव घेता आला नाही. परंतु वरुण राजाने हलक्याश्या सरी आमच्या अंगावर शिंपडून ती इच्छा देखील पूर्ण केली  क्षणभर तिथून दिसणारा जीवधन ,वानरलिंगी सुळका त्यात अधून मधून येणारे दाट धुक्यांचे लोळ ते चित्र डोळ्यात साठवून ठेवावे असे होते.असे हे अविस्मरणीय क्षण डोळ्यात साठवून आम्ही चिंतामण कडे जेवणासाठी निघालो आता एव्हाना लवकरात लवकर पोटातल्या भट्टीत लागलेली आग विझवायची होती त्या मुळे सर्वांनी च आपली पावले वाढवली अन तिथे सर्वांनी मनमुराद जेवणाचा आस्वाद घेऊन परतीचा प्रवासाला लागलो

निसर्गाने नटलेल्या व तितकाच इतिहास संपन्न असलेल्या ह्या एक दिवसाच्या मोहिमेत भटकंतीत भरपूर काही जगायला मिळालं  सिमेंटच्या जंगलापासून दूर जिवलगांसोबत सह्याद्रीच्या सानिध्यात इतिहास उलगडणाऱ्या आड वाटा जगायला मिळाल्या. 


सर्वांचे पुनःश्च धन्यवाद

सचिन भांड

सह्याद्रि ट्रेकर्स,परिवार 🚩

No comments:

Post a Comment

देवभूमी यात्रा

  ​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ​‘मनात भक्ती...